संक्रमितांचा बरे होणाची टक्केवारीही झाली 34.06 एकूणरुग्णसंख्या 86 हजार 508
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील कोरोनाबाधितांची अथवा सामान्य ताप असणाऱया रुग्णांची कोरोना तपासणीला वेग आला आहे. सध्या दिवसभरात तब्बल 90 हजार चाचण्या केल्या जात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने प्रसिद्धीस दिली आहे. त्याचबरोबर देशाची एकूण रुग्णसंख्या 86 हजार 508 झाली असून राज्यांच्या तुलनमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.
शनिवारी दिवसभरात 970 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 103 जणांचा मृत्यु झाला आहे. रुग्णांची एकूण संख्या 86 हजार 508 असून मृतांची संख्या 2752 आहे. तथापि रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 34.06 इतकी वाढली असून30 हजार 153 रुग्ण खडखडीत बरे झाले आहेत. तर 53 हजार 35 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.
गेल्या तीन दिवसांपासून कोरोना चाचण्यांना वेग आला आहे. आतापर्यंत 20 लाख 39 हजार 952 चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर गेल्या तीन दिवसांपासून हा वेग तब्बल 90 हजार चाचण्या प्रतीदिन झाला आहे. यामुळे रुग्णसंख्या अथवा संशयितांची संख्या वाढत असल्याचे दिसत असले तरीही रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही वाढून 12.9 दिवसांवर पोहोचला आहे. यामुळे उपचारांना रुग्ण प्रतिसाद देत असून खडखडीत बरे होणाऱयांची संख्याही वाढली असल्याची सकारात्मक बाब पुढे आली आहे. नागरिकांच्या स्वयंशिस्तीमुळे हे शक्य झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
राज्यांचा आढावा घेतला असता त्यामध्ये मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटे पूर्णपणे कोरोनामुक्त झाली आहेत. तर महाराष्ट्रात सर्वाधिक 29100 रुग्ण आहेत. तर मृतांची संख्याही 1068 आहे. तेथे 1140 पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह असून 862 जणांवर उपचार सुरु आहेत. तर 10 पोलिसांचा मृत्यु झाला आहे.
परदेशातील नागरिकांना स्वगृही आणण्याकरता नौदल आणि हवाई दलाची विमाने कार्यरत झाली आहेत. ऑपरेशने समुद्र सेतुअंतर्गत नौदलाचे जलाश्व जहाज मालदीव येथील 588 भारतीयांना घेऊन निघाले असून ते रविवारी सकाळी केरळच्या कोचीन बंदरात दाखल होईल. तर अमेरिकेतील नेवार्कहून 132 भारतीय शनिवारी पहाटे 3.14 वाजता हैदराबादमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, रस्त्याने पायी जाणाऱया मजुरांसाठीही सरकारने विविध उपाय जारी केले आहेत.अशा मजुरांना जवळच्या निवारागृहात नेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय ज्यांना स्वगृही जायचे आहे, त्यांच्यासाठी संबंधित राज्यांनी समन्वयाने रेल्वे आणि बसची सुविधा उपलब्ध करुन द्यायची आहे. ही जबाबदारी पूर्णपणे संबंधित दोन्ही राज्यांची असेल, असेही या निवेदनात म्हटले आहे.