प्रतिनिधी/ रत्नागिरी
लॉकडाऊनमुळे रद्द झालेल्या रेल्वे गाडय़ांच्या तिकीटाची पूर्ण रक्कम परत केली जाणार आहे. मात्र, सध्या रोकड उपलब्धतेचा प्रश्न असल्याने कोकण रेल्वेने आपल्या तिकिट खिडक्या बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे ज्या प्रवाशांची तिकिटे रद्द झाली आहेत, त्यांना परतावा मिळवण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहाली लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने टाळेबंदी जारी केली. त्यामुळे सार्वजनिक वाहतुक सेंवा देणारी रेल्वेसेवाही बंद ठेवण्यात आली. या काळात धावणाऱया गाडय़ाच रद्द झाल्याने प्रवाशांची तिकीटे आपोआपच रद्द झाली. ज्या प्रवाशांनी ऑनलाईन तिकीटे काढली होती, त्यांची तिकीट रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. तर तिकीट खिडक्यांवर काढलेल्या तिकीटाचे पैसे याच खिडक्यांवर परत केले जाणार आहेत. यामध्ये एजंटकडे काढलेल्या तिकीटांचा समावेश आहे.
मात्र, सध्या कोकण रेल्वेच्या रत्नागिरीसह सर्व स्थानकांमधील तिकीट खिडक्या रोकड उपलब्धतेच्या कारणावरून बंद ठेवण्यात आल्या आहेत. पुरेशी रोकड उपलब्ध झाल्यावर या खिडक्या सुरु करण्यात येणार आहेत. तिकिट रद्द झाल्यानंतर तीन महिन्यात त्याचा पूर्ण परतावा मिळण्याची हमी आहे. त्यामुळे ग्राहकांनी खिडकी उघडल्यावर संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे अधिकाऱयांनी केले आहेत.