प्रतिनिधी / असळज :
कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली कोल्हापूर पोलिस दलाच्या वतीने जिल्ह्यात जनतेच्या मदतीसाठी ‘मिशन संवेदना’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याद्व्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांचेकडून धान्य स्वरुपात मदत घेवून गरजू व्यक्तींना वाटण्यात येत आहे.
या उपक्रमा अंतर्गत गगनबावडा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील असळज, वेसरफ येथील रस्त्याचे काम, इमारत बांधकाम तसेच विहीर बांधकाम करणाऱ्या परराज्यातील १५ कुटुंबाना तसेच तिसंगी, किरवे, निवडे, वेसर्डे येथील ३५ गरजू व गरीब कुटुंबाना धान्य वाटप करण्यात आले आहे. बावेली पैकी धनगरवाडा, जर्गीपैकी धनगरवाडा व शेळोशीपैकी धनगरवाडा येथील लोक रानमेवा विकून पोट भरतात परंतु सद्या लॉकडाऊन मुळे सर्व व्यवहार बंद असलेने त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गगनबावडा पोलिस ठाण्याचे सपोनि रणजित पाटील यांच्यावतीने ‘मिशन संवेदना’ उपक्रमांतर्गत ३५ कुटुंबाना तांदूळ, गहू, डाळ अशा धान्य स्वरुपात मदत वाटप करण्यात आली.
गगनबावडा तालुक्यातील जवळपास १०० कुटुंबाना धान्य वाटप करण्यात आले. यापुढेही सामाजिक बांधिलकी म्हणून या संकटाच्या काळात गरीब व गरजू कुटुंबाना धान्य व आरोग्याविषयी लागणारी मदत केली जाणार आहे. यासाठी गगनबावडा पोलिस ठाणेचे सपोनि रणजित पाटील व सर्व कर्मचारी यांनी या सामाजिक कामासाठी विशेष प्रयत्न केले.