कमी मनुष्यबळाचा वापर, पैसा, श्रम, वेळ बचत
वार्ताहर / म्हासुर्ली
सध्या ग्रामीण भागात सर्वत्र खरीप हंगामातील पिक काढण्याची सुगी सुरु आहे. परिणामी शेत शिवारात माणसांची लगबग वाढली असून पिकांची मळणीचे काम जोरात सुरु आहे.मात्र वाढती महागाई व मजुर टंचाई यामुळे शेतीकाम जिकरीचे बनले असून धामणी खोऱ्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर व मळणी मशीनला फाटा देत भाताची मळणीसाठी स्वतःच्या मोटरसायकलचा वापर करत या सर्वांवर पर्याय शोधला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे श्रम, वेळ व पैसे वाचत असल्याने दुचाकी मळणी फायदेशीर ठरत आहे.
राधानगरी, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यात विभागलेला धामणी खोऱ्यात बागायती क्षेत्र कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भात पिकाची रोप लागण पद्धतीद्वारे शेती केली जाते. तसेच खोऱ्यातील अनेक मोठ्या शेतकऱ्यांनी शेतीत यांत्रिकीकरणाचा अवलंब करत आहेत. मात्र अनेक छोटे शेतकरी मात्र या पासून लांब आहेत.सध्या धामणी खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर भात कापणी मळणीची कामे सुरू असून मजुरांची टंचाई जाणवत आहे.
भात मळणी चे काम मोठ्या कष्टाचे व त्रासाचे असून यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासते. धामणी खोऱ्यातील डोंगर रांगामध्ये मोठ्याप्रमाणावर भाताची शेती केली जाते.परिणामी या ठिकाणी मोठे ट्रॅक्टर अथवा पावर टिलर ही जात नाहीत. त्यामुळे भात मळणी करणे अडचणीचे ठरत आहे.अशा ठिकाणी पायवाटेने मोटरसायकल नेऊन भात मळणी करणे सोपे जात आहे.
शेतातच ताडपत्री अंथरून त्यावरो कापलेले भात गोल आकारात मांडून त्यावरुन मोटरसायकल फिरवल्यावर सुलभ पणे तसेच कमी मजुराकरवी भाताची मळणी होत आहे. सध्या ग्रामीण भागात सर्रास पणे मळणीसाठी दुचाकींचा मोठ्या प्रमाणात केला जात आहे.वाढलेल्या डिझेलच्या दरामुळे मळणी मशीन, पावर टिलर अथवा मोठा ट्रॅक्टर भाड्याने घेऊन भात मळणी खर्चाचे झाल्यानेच शेतकरी वर्गाने कल्पकतेने मोटरसायकलचा वापर भात मळणीसाठी सुरु केला असल्याने खर्चाचा ही ताळमेळ बसला आहे.
यापूर्वी भात मळणीसाठी जनावरांच्या साहाय्याने केली जाणारी खळ्यावरील मळणी इतिहास जमा झाली असून त्यानंतर मोठ्या ट्रॅक्टर वरील तसेच पावर टिलर वरील मळणी मशीन, तसेच खाट, बजले, आदीवर भात झोडपून धान्य मळणी करण्याकडे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा कल होता.मात्र गरज ही शोधाची जननी आहे या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरत कालातंराने यात बदल करत आपल्या दैनदिन वापरातील दुचाकी मोटर सायकलचा वापर करतअसल्याचे चित्र सर्वत्र आहे.
महागाई आणि मजूर टंचाईच्या काळामध्ये भात मळणीसाठी मळणीच्या अन्य साधना पेक्षा मोटरसायकलने केलेली मळणी स्वस्त व सुलभपणे होत असून वेळ,श्रम तसेच पैशाची बचत होत आहे. तसेच मळणीसाठी मनुष्य बळ ही कमी लागत आहे.
-बाळासो मलकापुरे शेतकरी,म्हासुर्ली