वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोव्हिड-19 महामारी संकटामुळे जागतिक क्रिकेट क्षेत्रावर विपरित परिणाम होत आहेत. कोरोना महामारीच्या संकटानंतर क्रिकेट या क्रीडाप्रकारात कितीही प्रमुख बदल केला तरी क्रिकेटपटूंना नेहमीच कोरोनाचा धोका राहील, असे प्रतिपादन भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीरने वृत्तसंस्थेशी बोलताना केले आहे.
कोरोना महामारी परिस्थिती निवळल्यानंतरही क्रिकेटपटूंना मैदानावर वावरताना अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. अलिकडेच चेंडूला लकाकी आणण्यासाठी सलाईव्हाच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनापासून शक्यतो अलिप्त राहण्याकरिता क्रिकेट क्षेत्रात अधिक बदल करणे शक्य होणार नाही, असेही गंभीरने म्हटले आहे. क्रिकेटमध्ये सोशल डिस्टनसिंग नियमाची अंमलबजावणी होवू शकेल पण इतर नियमाची अंमलबजावणी करणे सोपे नाही. चेंडूशी नेहमीच क्रिकेटपटूंचा संपर्क येत असतो. झेल घ्यावयाचा असेल तर क्रिकेटपटूला चेंडूला स्पर्श करावा लागेल. क्रिकेट या क्रीडाप्रकारात खेळाडूंना कोरोनापासून कदाचीत सावधगिरी बाळगता येईल पण फुटबॉल आणि हॉकीमध्ये हे जवळपास अशक्य असल्याचे गंभीरने म्हटले आहे.