गटारीच्या उघडय़ा सळय़ांमुळे नागरिकांना धोका : काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हाती घेतलेली विकासकामे संथगतीने सुरू असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. क्लब रोड येथील काम पूर्णपणे बंदच ठेवले असून, कामे अर्धवट झाली आहेत. परिणामी रस्त्याच्या बाजुला उघडय़ा असलेल्या सळय़ा वाहनधारक आणि पादचाऱयांना जीवघेण्या बनल्या आहेत. याकडे स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत हाती घेतलेली कामे वेळेत होत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. उघडय़ावर ठेवलेल्या गटारीच्या सळय़ा पादचारी व वाहनधारकांना धोकादायक ठरत आहेत. यापूर्वी सळय़ांमुळे काही नागरिकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे अर्धवट असलेली विकासकामे तातडीने पूर्ण करा, अशी सूचना सातत्याने करण्यात येते. पण प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. मध्यवर्ती बसस्थानक तसेच मंडोळी रोड अशा विविध ठिकाणी उघडय़ा सळय़ांमुळे नागरिकांचे जीव गेले आहेत. याची कल्पना स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांना असूनही कामे पूर्ण करून घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांना आणखीन किती बळी हवेत, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
राणी चन्नम्मा चौक ते गांधी चौक (अरगन तलाव) पर्यंतच्या क्लबरोडचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. सदर रस्त्याच्या दुतर्फा गटारी आणि पेव्हर्स घालण्याचे काम करण्यात येत आहे. पण या रस्त्याच्या एका बाजुच्या गटारीचे काम पूर्ण झाले असून, दुसऱया बाजूचे काम अर्धवट अवस्थेत आहे. सीपीएड मैदान ते अरगन तलावपर्यंत गटारीचे बांधकाम रखडले आहे. सदर बांधकाम मागील काही महिन्यांपासून बंद असून रस्त्याशेजारी गटारीसाठी घालण्यात आलेल्या सळय़ा उघडय़ावर सोडण्यात आल्या आहेत. हा रस्ता खूप वर्दळीचा असून या रस्त्यावरून सीपीएड मैदानावर जाणारे मॉर्निंग वॉकर्स तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे या सर्वांनाच याचा धोका निर्माण झाला आहे. अलिकडे सीपीएड मैदानावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. पण या दरम्यानच्या गटारीचे काम रखडले असल्याने नागरिकांना धोकादायक बनले आहे. या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण, अशा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. सदर काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.