स्लम डेव्हलपमेंट बोर्डाच्या माध्यमातून 30 कोटींचा निधी मंजूर : आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर शहरात स्लम डेव्हलपमेंट बोर्डाच्या माध्यमातून 469 घरे बांधली जाणार आहेत. यासाठी जवळपास 30 कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी शुक्रवारी खानापूर येथील आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्या म्हणाल्या, कर्नाटक राज्य शासनाने शहरातील राजश्री शाहू वसाहत (डोंबार कॉलनी), नाईक गल्ली तसेच हरिजन गल्ली, स्लम एरिया म्हणून काही वर्षांपूर्वी घोषित केली आहे. यामुळे स्लम बोर्डाच्यावतीने या तिन्ही गल्ल्यांसाठी गृहनिर्माण योजना मंजूर केली आहे. त्या अंतर्गत एकूण 469 घरे मंजूर झाली आहेत. त्यामध्ये राजश्री शाहू वसाहतीसाठी 128, नाईक गल्लीसाठी 182 व हरिजन वाडय़ासाठी 159 घरे बांधण्याची योजना आहे. त्यामध्ये राजश्री शाहू वसाहतीमध्ये एकूण घरापैकी एक घर सामान्यांसाठी, 122 घरे अनुसूचित जातीसाठी, 5 घरे अनुसूचित जमातीसाठी, ओबीसीसाठी 1 घर तर नाईक गल्लीपैकी 8 घरे सामान्य, 12 अनुसूचित जातीसाठी 148 घरे अनुसूचित जमातीसाठी तर ओबीसी गटासाठी 4 व अल्पसंख्याक गटासाठी 9 घरांचा समावेश आहे. तसेच हरिजन वाडय़ामधील 13 सामान्य गटासाठी, अनुसूचित जाती गटासाठी 71, अनुसूचित जमातीसाठी 8, ओबीसी वर्गासाठी 7, तर अल्पसंख्याकासाठी 60 घरे बांधून देण्याची योजना असल्याची माहिती आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी यावेळी बोलताना दिली.
ही सर्व घरे बांधण्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. आता नियमानुसार पात्र व्यक्तींना घरे मंजूर केली जाणार आहे. या घरबांधणीनंतर त्या वसाहतीमधील आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचीही पूर्तता करण्यात येणार असल्याचे आमदार अंजली निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.
नगरोत्थन योजनेतून 5 कोटी मंजूर
खानापूर शहरात नगरोत्थन योजनेखाली 5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पूर्वीच्या काळात केवळ 2 कोटी इतकाच निधी मंजूर झाला होता. पण सातत्याने झालेल्या पाठपुराव्यामुळे 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आता या निधीमधून कोणती विकासकामे हाती घ्यावी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच एक बैठक होणार असून या बैठकीत विकासकामांची मंजुरी मिळणार असल्याची माहिती देखील आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी यावेळी दिली.
वास्तविक खानापूर नगरपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रुपांतर व्हावे, यासाठी गेली तीनवर्षे पाठपुरावा करण्यात आला. खानापूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तसेच आता नगरपरिषद होण्यासाठी आवश्यक असलेली लोकसंख्याही असल्यामुळे नगरपरिषदेचा दर्जा मिळावा, अशी आमची मागणी आहे. खानापूर नगरपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा मिळाल्यास 5 कोटी ऐवजी 10 कोटी निधीदेखील मंजूर होऊ शकतो. पण अद्याप राज्य शासनाने यासंदर्भात निर्णय घ्यावा लागणार आहे. तरीदेखील आता मंजूर झालेल्या 5 कोटी निधीमधून शहरातील विकासकामे हाती घेणार असल्याची माहिती आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी यावेळी दिली.