राज्य सरकारचा निर्णय : उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनाच्या दुसऱया लाटेप्रमाणेच संभाव्य तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी ग्रामीण भागातही अत्युत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने सरकारने पावले उचलली आहेत. तालुका इस्पितळांसह खेडय़ांमध्ये विविध टप्प्यात 8,105 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. बेंगळूरमध्ये सोमवारी आरोग्य खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव जावेद अख्तर यांच्याशी चर्चा केल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा कोविड कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. अश्वथ नारायण यांनी ही माहिती दिली.
राज्यातील 146 तालुका इस्पितळांमध्ये अलिकडेच 4 ते 6 आयुसीयु बेड उपलब्ध आहेत. त्यांची संख्या 20 पर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी 1,925 आयसीयु बेड उपलब्ध होतील. शिवाय राज्यभरात 206 समुदाय आरोग्य केंद्रे असून तेथे प्रत्येकी 30 जनरल बेड आहेत. त्यांचे ऑक्सिजन सुविधायुक्त बेडमध्ये रुपांतर करण्यात येतील. तेव्हा ऑक्सिजन बेडची संख्या 6180 वर पोहोचेल. जिल्हा इस्पितळांमध्ये 50 आयसीयु बेडची व्यवस्था करण्यात येईल. आजच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
कोरोनाच्या दुसऱया लाटेत आपण होरपळून निघालो आहेत. त्यामुळे तिसऱया लाटेकडे दुर्लक्ष नको. यासाठी आरोग्य क्षेत्रात तळापासूनच पायाभूत सुविधा वाढविण्यात येतील. 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. सर्वांना लस मिळावी या उद्देशाने राज्य कोविड वॉर रुमच्या तपशिलामध्ये कोविड लसीकरणाची माहिती अपलोड करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
अलिकडेच 3 हजार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर खरेदीचा आदेश दिला आहे. आणखी 10 हजार कॉन्संट्रेटर खरेदीसाठी प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली आहे. सध्या प्रतिदिन 40 हजार रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट किट पुरवठा होत आहे. याची संख्या आणखी वाढविण्यासाठी निविदा मागविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे 5 लाख रेमडेसिवीर खरेदीसाठी जागतिक पातळीवर निविदा मागविण्यात आल्या आहेत, अशी माहितीही उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.