प्रतिनिधी/ गोडोली
शहरातील सर्वात जास्त वर्दळीचा असलेल्या राधिका रोडवर पाऊस पडला की गटाराच्या पाण्यासोबत कचरा वाहतो. पोलीस मुख्यालयाकडून पाण्याबरोबर येणाऱया कचऱयाने गटार तुंबले की पाण्यासोबत कचरा रस्त्यावर वाहत असून यामुळे अनेक पादचारी घसरुन पडले. मुळात किल्ले अजिंक्यताऱयावरुन येणारा कारागृहालगतचा ओढा अनेकांनी अतिक्रमण केल्याने ओढा गायब करून त्याचे पाणी याच छोटय़ा गटारात घातले आहे.
वरचेवर गटार साफ सफाई होत नसल्याने पाऊस पडला की पाण्यासोबत कचरा रस्त्यावर हे नेहमीचेच झाले आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी वरुन येणारा ओढय़ाचे पाणी गटारात घातल्याने पाणी वाढले की ही समस्या वर्षानुवर्षाची असून पालिकेकडून याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातो.
राधिका रोडवरील सर्व व्यावसायिकांनी गटार बंदिस्त केली असून ती स्वच्छ करता येत नाहीत. याबाबत काही सांगितले तर बडे पदाधिकारी याविषयी हस्तक्षेप करतात. गटारावरील अतिक्रमण काढल्यास हि समस्या दूर होईल, असे पालिकेच्या कर्मचाऱयांनी यावेळी ‘तरुण भारत’ शी बोलताना सांगितले.
अधिकाऱयांना कर्तव्य पार पाडू द्या
शहरात अनेकांनी अतिक्रमण केली असून त्याविरोधात ठोस कारवाई पालिकेने कधीच केली नाही. शहरातील सर्व गटारावर प्रत्येकाने सोईस्कर वापरासाठी ते बंदिस्त केली आहेत. ते हि अतिक्रमण असून त्यांना आधी नोटीस द्या. प्रत्येकावर दंडात्मक कारवाई आणि गुन्हे दाखल करा. आता अतिक्रमण विरोधात सुजाण नागरिक रस्त्यावर यायला हवे. त्याशिवाय सुधारणा होणार नाही. दबाव न आणता अधिकाऱयांना कर्तव्य पार पाडू द्या. हि मंडळी शहरातील अतिक्रमण निवडणुकीपुर्वी काढतील, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली. गटारावरील अतिक्रमणा विरोधात आता रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सुशांत मोरे यांनी सांगितले.