प्रतिनिधी/ पणजी
गावडोंगरीचे माजी सरपंच तथा वन हक्क समितीचे अध्यक्ष अशोक वेळीप यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये स्वागत केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यसभा खासदार गोवा तृणमूलच्या सहप्रभारी सुश्मिता देव आणि मीडिया प्रभारी ओम प्रकाश मिश्रा होते यांची उपस्थिती होती.
प्रवेशानंतर बोलताना वेळीप यांनी सामान्य लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गेल्या काही महिन्यांत ’टीएमसी’ने राज्यभरातील लोकांपर्यंत कसे पोहोचले यासंबंधी माहिती दिली. ‘गावडोंगरी पंचायतीत प्रामुख्याने ’एसटी’ लोकसंख्या आहे आणि भाजप किंवा काँग्रेस कधीही आमच्या मदतीला आलेले नाहीत. गोमंतकीयांना भेडसावणाऱया समस्या कमी करण्यासाठी तृणमूल गोव्यातील प्रत्येक शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आपण प्रवेश केला, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
त्यावेळी बोलताना सुष्मिता देव यांनी काँग्रेसचे निवडणूक प्रभारी पी. चिदंबरम यांच्या ढोंगीपणाकडे लक्ष वेधले. ’एखाद्याने काँग्रेस पक्ष सोडला तर त्याला देशद्रोही ठरवले जाते, मात्र याच पक्षात एखादा प्रवेश करतो तेव्हा तो देशद्रोही नसतो का?, असा सवाल उपस्थित केला. जो दुसऱया पक्षातून तुमच्याकडे येतो तेव्हा त्यानेही त्या पक्षाशी गद्दारीच केलेली असते, असे तुम्हाला वाटत नाही का? असेही त्या म्हणाल्या.
एखाद्याला आपल्या पक्षात प्रवेश घेण्यासाठी प्रेरित करणे, हा प्रत्येक पक्षाचा लोकशाही अधिकार आहे, याची जाणीव देव यांनी करून दिली.