पाकव्याप्त काश्मीर पूर्णपणे खाली करा : भाजम्मू काश्मीरमध्ये 4 जी सेवा नाहीरताचा पाकिस्तानला सज्जड दम
वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली
पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या हालचालींनी वेग घेतल्यानंतर भारताने जोरदार आक्षेप घेतला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असून तो रिक्त करण्यात यावा, असे भारताने पाकिस्तानला सुनावले आहे. तसेच भारतविरोधी कारवाया तत्काळ थांबविण्याचा इशारा भारतीय सैन्यप्रमुखांनी पाकिस्तानला दिला आहे.
भारताने गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये होणाऱया निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला विरोध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याची दखल घेत पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. गिलगिट-बाल्टिस्तानसह जम्मू काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानने या भागांवर कब्जा केला असून त्वरित हा प्रदेश खाली करावा, असे भारताने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच एका आदेशात ‘गव्हर्नमेंट ऑफ गिलगिट बाल्टिस्तान ऑर्डर’मध्ये निवडणुका घेता येतील का हे पाहण्याचे आदेश दिले होते. भारताने पाकिस्तानच्या या आदेशांवर आक्षेप घेतला आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये गिलगिट आणि बाल्टिस्तानचाही सामावेश आहे. हा पूर्णपणे कायदेशीरपणे भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या न्यायालयाला आमच्या क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका वक्तव्यात म्हटले आहे.
बेकायदेशीररित्या पाकिस्तानने कब्जा या भागावर पूर्वीपासूनच भारताचा अधिकार आहे. पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयांना भारत कठोर शब्दांत विरोध करत आहे. पाकिस्तानने ताब्यात घेतलेला हा भाग त्यांचा कधीच नव्हता. या क्षेत्रात मानवाधिकारांचे उल्लंघन झाले आहे. नागरिकांचे शोषण करण्यात आले आहे, असे भारताने स्पष्ट केले आहे.
…अन्यथा कारवाई अटळ : सैन्यप्रमुख
पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत दहशतवादी कारवाया सुरू आहेत. या कारवाया तातडीने कमी न झाल्यास भारतीय सैन्य सडेतोड कारवाई करण्यास सज्ज असल्याचा इशारा सैन्यप्रमुख नरवणे यांनी पाकिस्तानला दिला आहे. हंदवाडा येथील चकमक आणि वारंवार होणाऱया शस्त्रसंधी उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा शाब्दिक इशारा देत पाकिस्तानला सतर्क केले आहे. जगात सध्या कोरोनाचा फैलाव सुरू आहे. या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी पाकिस्तान भारताबरोबरच अफगाणिस्तानमध्येही कुरापती करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच हंदवाडा येथील चकमकीत हुतात्मा झालेल्या सहकाऱयांप्रती त्यांनी आदरभाव व्यक्त केला. सर्वसामान्य नागरिकांना वाचविताना या सहकाऱयांना प्राण गमावावे लागल्याने सैन्याला या सर्वांबद्दल गर्व असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला.
अखनूरपासून उरीपर्यंत एलओसीवर तणाव
श्रीनगर : गेल्या दोन दिवसात काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांच्या कारवाया वाढलेल्या असतानाच एलओसीवर अखनूरपासून उरीपर्यंत सर्वत्रच पाकिस्तानच्या हद्दीतून तोफांचा मारा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याबरोबरच बऱयाच ठिकाणी तोफा आणि मोर्टर्सचा मारा पाकिस्तानी सैन्याकडून सुरू आहे. या गोळीबाराला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावले. या संघर्षात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानी सैन्याची कटकारस्थाने सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. रविवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने राजौरी आणि पूँछ भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची माहिती सुरक्षा सूत्रांकडून देण्यात आली. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने राजौरीतील मंजाकोट भागात गोळीबार केला. या गोळीबारामुळे परिसरात लोकांमध्ये घबराट पसरली होती.