दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
सलग पाच दिवस उपोषण करणे ही सोपी गोष्ट नाही. तरीही राज्याच्या भल्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून ऍड. अमित पालेकर यांनी ते धाडस करून दाखविले आहे. त्याद्वारे त्यांनी गोमंतकीयांना जागे केले असून नव्या राजकीय क्रांतीची ही सुरुवात आहे, असे प्रतिपादन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.
शनिवारी मेरशी येथे ऍड. पालेकर यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर श्री. केजरीवाल पत्रकारांशी बोलत होते. सर्व कायदे धाब्यावर बसवून जुने गोवे येथे चक्क वारसा स्थळात करण्यात येणाऱया बंगल्याच्या बेकायदा बांधकामास विरोध करण्यासाठी पालेकर यांनी उपोषण केले होते. त्या दरम्यान सरकारने सदर बांधकामास दिलेले परवाने मागे घेतले. तसेच सदर बांधकाम पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश स्थानिक पंचायतीला दिले. त्यामुळे पाच दिवसानंतर पालेकर यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र त्यातून त्यांची प्रकृती बरीच खालावली होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी केजरीवाल शनिवारी मुद्दाम गोव्यात आले होते.
पालेकर यांनी गोव्याची भूमी, वारसा, संस्कृती, आणि एकूणच गोमंतकीयांच्या हितरक्षणासाठी कडक ऊन, जोरदार पाऊस, वादळ यांचा सामना करत उपोषण केले. या धाडसाबद्दल ते खरोखरच कौतुकास पात्र आहेत, असे केजरीवाल म्हणाले. तसेच या उपोषणाद्वारे गोव्यात राजकीय साफसफाई प्रारंभ झाली आहे, असे सांगून सर्व दैवीशक्ती एकत्र येत आहेत आणि येत्या निवडणुकीत क्रांती घडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या पाच दिवसांपासून पालेकर बेमुदत उपोषणाला बसले होते. त्यामुळे तब्येत ढासळू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना उपोषण सोडण्याचा सल्ला दिला. तरीही त्यांनी माघार न घेता ते आपल्या मतावर ठाम राहिले. या दरम्यान त्यांना सर्वत्र मिळत असलेला पाठिंबा पाहून अखेर सरकारला नमते घ्यावे लागले.
‘राजकीय स्टंट’ वाटत असल्यास
स्वतः उपोषण करून दाखवा
असे असतानाही पालेकरांच्या उपोषणास जे राजकीय ‘स्टंट’ ठरवतात त्यांनी स्वतः पाच दिवस उपोषण करून दाखवावे, असे आव्हान केजरीवाल यांनी दिले. उपवास हा अध्यात्मिक अनुभव आहे. त्याद्वारे शरीर आणि आत्म्याची शुद्धी होते. एकीकडे पालेकरांना सर्व स्तरांतून लोकांचा जोरदार पाठिंबा मिळत आहे, तर दुसरीकडे राजकारण्यांना यात ‘राजकीय स्टंट’ दिसतो. यातूनच त्यांची पात्रता दिसून येते. तसेच पक्षांतराने गोव्याला किती खालच्या स्तरावर नेले आहे, तेही स्पष्ट होते. मात्र गोव्यात आता क्रांतिपर्व सुरू झाले आहे, असेही केजरीवाल म्हणाले.
अत्यंत भावनिक अनुभव ः पालेकर
या उपोषणादरम्यान गेल्या पाच दिवसांत मिळालेला पाठिंबा, प्रेम, माया पाहून मी भारावून गेलो आहे. सोबत उपोषण करणारी एक महिला मातेच्या मायेने नियमितपणे माझ्या आरोग्यावर लक्ष ठेवत होती, माझी नाडी तपासत होती. मी उपोषण संपवल्यानंतर ती महिला रडायला लागली. माझ्यासाठी हा अत्यंत भावनिक असा अनुभव होता, असे पालेकर यांनी सांगितले.
लढाई अद्याप संपलेली नाही
उपोषणादरम्यान राज्यभरातील नागरिकांनी स्वतःही आंदोलनात सहभाग घेत दिलेल्या पाठिंब्यामुळे सरकारला नमते घ्यावे लागले. हा संपूर्ण गोमंतकीयांचा विजय आहे. मात्र लढाई अद्याप संपलेली नाही. आता कायदेशीर लढा सुरू होईल आणि इमारत पाडली जात नाही तोपर्यंत तो चालूच राहील, असे पालेकर म्हणाले.
या उपोषणातून आम्ही राजकीय फायदा उठवला असे कुणालाही वाटत असेल तर, त्याचे उत्तर होय असेच असेल, असे ठाम मत पालेकर यांनी व्यक्त केले. टीका करणाऱयांनाही याचा राजकीय फायदा उठवता आला असता. ते का पुढे आले नाहीत? त्यांना कुणी अडवले होते का? असे सवाल पालेकर यांनी उपस्थित केले.