वर्षभरात गेले तीन हजार बळी
प्रतिनिधी /मडगाव
मागील वषी, म्हणजेच 22 जून 2020 रोजी गोव्याच्या भूमित कोविड मृत्यूची पहिली वाईट बातमी मिळाली होती. काल मंगळवार दि. 22 जून रोजी या घटनेला एक वर्षपूर्ण झाले. त्यानंतर पुढच्या 365 दिवसांमध्ये (म्हणजे 22 जून 2021 पर्यंत) गोव्यात एकूण 3008 बळीची नोंद झाली. दिवंगत चंद्रकांत सावंत हे कोरोनाचे प्रथम बळी आणि दिवंगत शंकर हे कोरोनाचे द्वितीय बळी ठरले होते. विशेष म्हणजे या दोघांचाही बळी एकाच दिवशी गेला होता.
कोविडने देशभरात थैमान घातले होते. मुंबई व दिल्ली या सारखी महानगरे कोविडमुळे हादरून गेली होती. सरकारने कोविड रोखण्यासाठी लॉकडाऊनचा आधार घेतला. मात्र, कोविड रोखणे अद्याप शक्य झालेले नाही. छोटय़ाशा गोव्यात गेल्या वर्षभरात 3008 लोकांचा बळी हा कोरोनामुळे गेलेला आहे. ज्या लोकांना अन्य आजारांची पार्श्वभूमी होती तेच कोविडचे सर्वाधिक बळी ठरले. कोविडच्या पहिल्या लाटेत जेव्हढा फटका गोव्याला बसला नव्हता, तेव्हढा फटका दुसऱया लाटेत बसला. अनेकांनी आपले प्रियजन गमावले. पेडण्यातील एकाच कुटुंबांतील चार व्यक्ती कोविडमुळे गेल्या. त्यात तीन व्यक्ती तर एकाच दिवशी. काही कुटुंबांतील दोन-दोन व्यक्ती कोविडच्या बळी ठरल्या. अनेक कुटुंबे यात उध्वस्त झाली. घरातील कर्त्या सवर्त्या व्यक्ती गेल्या. अद्याप ही कुटुंबे या धक्क्यातून सावरलेली नाहीत.
गोवा पूर्णपणे हादरून गेलाय. गोवा सावरण्याचा प्रयत्न करीत असला तरी बळीची संख्या अद्याप पाचच्या खाली आलेली नाही. काल मंगळवारी पुन्हा 11 बळीची नोंद झालेली आहे. आत्ता कोविडला दूर ठेवण्यासाठी सरकारने लसीकरण योजना हाती घेतलीय. हळू हळू लोकांमध्ये जागृती झालेली आहे. मात्र, मनातील भीती दूर झालेली नाही. सरकारने जारी केलेला कर्फ्यु सुद्धा काही प्रमाणात कोविडच्या वाढत्या केसीसवर अंकुश ठेवण्यात उपयुक्त ठरला आहे.
डॉ. मधुने दूर केला गैरसमज….
‘कोविड-19’मुळे मृत्यू आलेल्यांचा आदर न करता मृतदेह स्मशानभूमीत आणण्यास किंवा स्वीकारण्यास विरोध करण्याच्या घटना सुरुवातीला गोव्यात घडल्या. कोविडमुळे मृत्यू येणाऱयांबद्दल समाजात प्रचंड गैरसमज होता. मृतदेहामुळे कोरोना फैलावण्याची भीती सर्वांनाच होती. त्यामुळे गावात अंत्यसंस्कार करायचे नाही असा पवित्रा सर्वांनीच घेतला होता. मात्र, ‘गोमेकॉ’चे साहाय्यक प्राध्यापक तथा फॉरेन्सिक तज्ञ डॉ. मधु घोडकिरेकर यांनी कोविडमुळे येणाऱया मृत्यू संदर्भातील गैरसमज दूर करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली व लोकांच्या मनातील भीतीही दूर झाली. त्यामुळेच आज बहुतेक मृतदेहांवर मयताच्या कुटुंबियांनीच अंत्यसंस्कार करण्यास पुढाकार घेतला.
हा गैरसमज जर दूर झाला नसता तर सरकारवर अतिरिक्त ताण पडला असता. डॉ. माधु घोडकिरेकर यांनी अंत्यसंस्कार करण्यास विरोध होत असल्याचे लक्षात येताच फोंडा पालिकेत पहिली बैठक घेतली व गैरसमज दूर करण्यास महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर अनेक ठिकाणी त्यांनी अशा बैठका घेऊन लोकांच्या मनातील गैरसमज दूर केला. त्यामुळेच मयताच्या नातेवाईकांना आपल्या प्रियजनावर अंत्यसंस्कार करण्याची संधी मिळाली.
फोंडा नगरपालिकेच्या वैकुठधाम स्मशानभूमीचे कर्मचारी आणि रत्नांत वेळीप (शवगृह कर्मचारी) सचिन गांवस आणि संदेश सावंत (ईएमआरआय शववाहिका कर्मचारी) आणि मारुती गडकरी (ईएसआय कर्मचारी) यांनी पहिल्या कोविड बळीवर अंत्यसंस्कार करण्याचे धाडस केले. पीपीई किट वापरून त्यांनी अंत्यसंस्कार करण्यास पुढाकार घेतला. डॉ. मधु घोडकिरेकर हे या घटनचे साक्षीदार होते. या कर्मचाऱयांनी दाखविलेले धाडस इतरांना प्रेरणादायी ठरल्याचे डॉ. मधु सांगतात.
डॉ. मधु घोडकिरेकर यांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासदंर्भात एसओपी जारी केला. हाच एसओपी नंतर देशाच्या इतर भागांनी उचलून धरला व त्या प्रमाणे अंत्यसंस्कार होऊ लागले. कोविडच्या काळात डॉ. मधु यांनी जारी केलेले अन्य काही एसओपी सुद्धा देशपातळीवर यशस्वी ठरले. त्यामुळे दिल्लीत सुद्धा डॉ. घोडकिरेकर यांनी मानाचे स्थान प्राप्त केलेले आहेत.