रुम रेट 50 ते 80 टक्केपर्यंत स्वस्त, पर्यटन हंगाम गती घेत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिक चिंतेत
प्रतिनिधी/ पणजी
कोरोना महामारीमुळे सर्वात मोठा दणका राज्यातील पर्यटन व्यवसायाला बसला असून ध्यानीमनी नसताना आलेल्या या संकटाने जगभरातील लोकांना घरातच बंदी बनवून टाकले. परिणामी फिरतीवर, पर्यटनासाठी जाणाऱयांचे सर्व मार्ग बंद झाले. त्या पार्श्वभूमीवर सुमारे 8 महिन्यांच्या बंदीनंतर नुकताच कुठे हा उद्योग सावरू लागला आहे. तरीही कोरोनाची भीती कमी झालेली नसल्यामुळे फिरण्याची इच्छा असूनही लोक घराबाहेर पडण्यास धजत नसल्याचे दिसून येत आहे.
त्याही परिस्थितीत जे कुणी येतात त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आता राज्यातील निवासी हॉटेल व्यवसायात जबर स्पर्धा सुरू झाली आहे. हे आव्हान पेलताना धंद्यात तग धरून राहण्यासाठी राज्यातील तारांकित ते सामान्यातील सामान्य हॉटेल चालकांनीसुद्धा आपल्या किंमती तब्बल 50 ते 80 टक्क्यांपर्यंत कमी केल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार ज्या हॉटेलचे दर रात्रीसाठी 24 हजार पर्यंत होते ते आता केवळ 6 हजारात देण्यात येत आहेत. तसेच 20 हजारचे रूम 5 हजारात, 18 हजारचे 3 ते 4 हजारात, रु. 7700 चे रु. 2250, तर रु. 6700 चे रु. 1350 एवढय़ा अल्प किंमतीत उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
त्याशिवाय एरव्ही रु. 1500 पर्यंत मिळणारे सर्व रूम्स् आता रू. 1000 पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होत आहेत. तसेच पॅकेज टूर्सच्या किंमतीतही भारी कपात करण्यात आली आहे. त्यात तीन रात्रीच्या निवासासाठी 20 ते 30 हजारपर्यंत दर आकारले जात असून ग्राहकांना विमानतळावरून आणणे आणि पुन्हा नेऊन सोडणे या सेवा मोफत दिल्या जात आहेत. काही हॉटेल्सनी आपले ’ऑफ सिझन’ दरच ग्राहकांसाठी कायम ठेवले आहेत.
विद्यमान स्थितीत हॉटेल्स चालविणे महाकठीण बनले आहे. कर्मचाऱयांचा पगार देणेसुद्धा अनेक मालकांना न परवडण्यासारखे बनले आहे. अनेक हॉटेल्स मालकांनी कोरोनाकाळात कर्मचाऱयांना घरी पाठविले होते. ते अद्याप आलेले नाहीत. ज्या किरकोळ कर्मचाऱयांना ठेवले होते, त्यांच्या पगारात 50 टक्क्यांपेक्षा जास्त कपात करण्यात आली होती. अशा परिस्थितीत स्थिरस्थावर होण्यात आणखी बराच अवधी जाणार आहे. त्यातूनच ग्राहक मिळविण्यासाठी अशा प्रखर स्पर्धेत उतरण्याची पाळी हॉटेल चालकांवर आलेली आहे.
किनारी भागातील अनेक हॉटेल्सची तर याहूनही वाईट स्थिती आहे. ही हॉटेल्स मार्च महिन्यात ताडपत्री झाकून बंद करण्यात आली ती अद्याप जैसे थे च आहेत. पुढील दोन महिन्यात सुद्धा ती सुरू होण्याची शक्यता दिसत नाही.
राज्यात सध्या देशातील काही जवळच्या शहरातील लोकच येतात. केंद्राने अद्याप आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमानांवर घातलेली बंदी उठविलेली नसल्याने ब्रिटेन, युरोप, रशिया यासारख्या देशांतून पर्यटक येणे सुरू झालेले नाही. त्यामुळे पर्यटन व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. आता या याच महिन्यात दिवाळी आणि पुढील महिन्यात नाताळ तसेच नंतर नववर्ष स्वागताचा जल्लोष या सुट्टय़ांच्या काळात राज्यात मोठय़ा प्रमाणात पर्यटक दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु हे सर्व काही देशातील कोरोनाच्या स्थितीवर अवलंबून असल्याचे मत पर्यटन उद्योगाशी संबंधित एका संघटनेच्या पदाधिकाऱयाने व्यक्त केले.
राज्य सरकारने आतापर्यंत विविध प्रकारातील 900 हॉटेल्स सुरू करण्यास पर्यटन खात्याने मान्यता दिली असून पुढील दोन महिन्यांत आणखी काही हॉटेल्सना मान्यता देण्यात येणार आहे. या काळात पर्यटकांची संख्या वाढल्यास हॉटेल व्यावसायिक कमी केलेल्या दरांचा फेरआढावा घेण्याची शक्यता आहे. बडय़ा हॉटेल्सना ऑनलाईन ग्राहक मिळवून देणाऱया मेक माय ट्रीप, ओयो, ट्रीप एडव्हायझर, यासारख्या कंपन्यांमुळे तारांकित हॉटेल्सना समाधानकारक ग्राहक मिळत आहेत. लहान हॉटेलचालकांची मात्र प्रखर स्पर्धेमुळे हालत खराब झाली आहे.