प्रतिनिधी /पणजी
स्वातंत्र्यसेनानी मोहन रानडे यांचे गोवा मुक्तीलढय़ातील कार्य अविस्मरणीय असून युवा पिढीने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, म्हणून गोव्यात त्यांचे स्मारक व्हावे असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार आणि कै. रानडे यांच्या सहवासात तब्बल पन्नास वर्षे राहिलेले वामन प्रभू यांनी काढले. रानडे यांनी पूणे येथे स्थापन केलेल्या स्वामी विवेकानंद जीवन ज्योत संस्थेचे पदाधिकारी यासाठी कार्यरत असून त्यांनी शंभू भाऊ व आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आदिंची भेट घेतल्याचेही श्री. प्रभू यांनी यावेळी सांगितले.
कै. मोहन रानडे दांपत्याचे चिंबल येथील वास्तूत दीर्घकाळ वास्तव्य होते, त्या वास्तूत ‘स्वातंत्र्य सेनानी पद्मश्री मोहन रानडे’ सभागृहाचे उद्घाटन रानडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रभू बोलत होते.
सर्वप्रथम श्री. प्रभू, स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेचे माजी उपाध्यक्ष तथा रानडे यांच्या आजारपणात त्यांना साथ देणारे भाई उर्फ प्रदीप ताम्हणे स्थानिक सरपंच मनिषा चोपडे आदिनी समई प्रज्वलिन करून रानडे यांच्या तसविरीस हार अर्पण करून फुले वाहिली. समाजोन्नती संघटनेचे पदाधिकारी विराज बांदेकर यांनी स्वागत केले. सर्वश्री महेश चव्हाण सुनील मोचेमाडकर, उदय मळगांवकर, संतोष पार्सेकर यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. यावेळी स्वातंत्र्यसेनानिक श्यामसुंदर कळंगुटकर, रानडे दांपत्याने चिंबल येथे स्थापन केलेल्या गरीब व निराधार महिलांसाठीच्या कार्यात सक्रिय असलेल्या बालवाडी सेविका ज्योती रामचंद्र भंडारी आणि पुणेस्तित समाजसेविका व रानडे दांपत्याच्या सेवेत अनेक वर्षे कार्यरत असलेल्या श्रीमती शोभना बल्लाळ यांचा अनुक्रमे भाई ताम्हणे, वामन प्रभू व सरपंच सौ. मनिषा चोपडेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि शुभू भाऊ बांदेकर संपादितरानडे यांच्या कार्यावरील ‘कार्यावळी’ पुस्तक भेट देण्यात आले. तिन्ही सत्कारमूतींची व भाई ताम्हणे रानडे यांच्या यांचा आठवणीना उजाळा देणारी भाषणे केली. अध्यक्षीय भाषणात शंभू भाऊ बांदेकर यांनी दरवर्षी समाजोन्नती संघटनेतर्फे 25 डिसेंबर हा रानडे याचा जन्मदिन साजरा करण्यात येणार असल्यचे सांगून त्यांच्या स्मृतीना उजाळा देण्यात येणार आहे व त्यांच्या नावाने उद्घाटन केलेले सभागृह चिंबल पंचायत क्षेत्र व आसपाच्या परिसरातील गरजवंतांना सभा, बैठका कार्यक्रम यासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. सौ. मनिषा चोपडेकरव ऍड. सौ. हर्षा नाईक यांच्या हस्ते मुलांना केक व मिठाई देऊन रानडे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमास जिल्हा पंचायतसदस्य श्री. गिरीश उस्कैकर, ऍड. संजिव सरदेसाई, गुरूनाथ पै, सुरेश परूळेकर आदिंची उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. सौ. हर्षा नाईक यांनी केले. सचिव महेश मोचेमाडकर यांनी आभार मानले.