प्रतिनिधी/ चिपळूण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसिलदार जयराज सूर्यवंशी यांनी गावागावात भेट देऊन माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. ग्राम कृती दलाला कार्यरत करून प्रशासनाकडून सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन ते सरपंचाना देत आहेत.
शासनाने लॉकडाऊन केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने आपले सर्व लक्ष शहरावर केंद्रित केले. गावपातळीवर लक्ष ठेवण्यासाठी ग्राम कृती दलाची स्थापना करण्यात आली असली तरी अनेक गावातील ही दले निद्रीस्त असल्याचे चित्र आजही पहायला मिळत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कृती दलांना कार्यरत करणे, त्यांचे मनोबल वाढवत गावागावातील परिस्थितीचा आढावा घेण्याच्यादृष्टीने तहसीलदार सूर्यवंशी हे तालुक्यात फिरत आहेत. मंगळवारी कालुस्ते, मालघर, मिरजोळी अशा खाडीपट्टयातील अनेक गावांना भेटी देऊन कोणतीही अडचण आल्यास प्रशासनाशी तत्काळ संपर्क साधा शक्य तितकी मदत दिली जाईल, असे सरपंचांना सागितले.
मिरजोळीचे कौतुक
मिरजोळी येथे भेट दिली असता गावात केलेल्या औषध व धूर फवारणीची माहिती त्यांना देण्यात आली. यावर सूर्यवंशी यांनी शहराप्रमाणेच फवारणी केल्याने ग्रामपंचायतीचे कौतुक केले. यावेळी सरपंच कनिज दलवाई, उपसरपंच श्रृतिका तांबे, सदस्य अहमद दलवाई, विनोद हिरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गंगाराम साळवी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव राजेश जाधव आदी उपस्थित होते.