प्रतिनिधी/ वाई
सर्वसामान्य शेतकऱयांच्या मालकीच्या असलेल्या सहकारी संस्थांमध्ये चुकीचे काम करणाऱयांवर तो कोणत्या पक्षाचा आहे हे न पहाता सहकारमंत्र्यांनी बेलाशक कारवाई करावी. जनतेनेही सहकारी संस्था चांगल्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात द्याव्यात. विरोधी पक्षात गेले की भ्रष्टाचारी आपोआप स्वच्छ होतात. मात्र दुसऱया पक्षातील लोकांच्या चौकशा लावल्या जातात हे राजकारण जनतेच्या लक्षात आले आहे, असे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
वाई शहरातील कृष्णा पूल, भाजीपाला फळ मार्केट व नगरपरिषद शाळा क्रं. 1 व 4 च्या इमारती या 34 कोटी रुपये खर्चांच्या विकासकामांचे भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमात आमदार मकरंद पाटील यांचा कोविड योध्दा व विकास योजनांचा पाठपुरावा केल्याबद्दल पालिकेच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. नगरसेवक चरण गायकवाड, डॉ. विजय ठोंबरे, विठ्ठल भोईटे, अशोक हगवणे, विशाल सावंत, साहिल भिसे, रमेश काळोखे व अनिल जगताप यांना कोविड योध्दा म्हणन गौरविण्यात आले. कार्यक्रमास आमदार शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, उदय कबुले, सुनील माने, प्रदीप विधाते, सभापती मंगेश धुमाळ, राजेंद्र तांबे, संजुबाबा गायकवाड, संगीता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
वृत्तपत्रातील नितीन पाटील यांच्या बातमीचा संदर्भ देऊन उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, किसन वीरांचे नाव असलेल्या कारखान्यावर एक हजार कोटींचा कर्जाचा बोजा आहे. तर त्यापेक्षा कमी खर्चात नवीन कारखाना उभा राहू शकेल. हे सभासदांनी लक्षात घ्यावे. कारखान्याला मदत करायला तयार आहे. आम्ही भेदभाव करीत नाही. परंतु जनतेही चांगल्या विचारांच्या लोकांच्या हातात सहकारी संस्था द्याव्यात. विरोधी पक्षात गेले की गोमुत्राने पवित्र होतात. फक्त भाजपा विरोधकांच्यामागे चौकशा लावल्या जातात. हेही जनतेच्या लक्षात आले आहे.
बाळासाहेब पाटील म्हणाले, भौगोलिक विविधता असताना जनतेला न्याय देणाऱया आमदार मकरंद पाटील यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. मागील पाच वर्षात विकासाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले परंतू महाविकास आघाडी सर्वांना बरोबर घेऊन काम करीत आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या पाठपुराव्यामुळे जिह्याचे वैद्यकीय महाविद्यालय आणि पाचशे खाटांचे रुग्णालयही सुरु होत आहे.
खासदार पाटील म्हणाले, कुणालाही न दुखावता जनतेची मने आणि मते जिंकणाऱया मकरंद पाटील यांचे कार्यकर्तृत्व पाहून लक्ष्मणराव पाटील यांची आठवण होते.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, मकरंद पाटील यांच्यासारख्यांकडून जिह्याचे नेतृत्व करण्याच्या अपेक्षा आहेत. त्यांनी पुरेशी विश्रांती घ्यावी. रात्री जागरण करू नये. काम न झाल्यास जनता पर्याय शोधते हे जाणून प्रकृतीची काळजी घ्यावी. जागतिक तापमान वाढ व हवामान बदलामुळे अतिवृष्टी आणि वादळे होत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवाराने किमान दहा झाडे लावणे बंधनकारक करावे, हा निर्णय धोरण म्हणून पक्षाने प्रथम घ्यावा.
आमदार पाटील म्हणाले, मागील पाच वर्षे भाकड गेली होती. पत्र घेऊन गेले तरी सत्ताधारी तोंडही बघायचे नाहीत. सुदैवाने राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आले हा आनंदाचा क्षण होता. सत्तेत आल्यानंतर दादांनी तातडीने पाचगणी व महाबळेश्वर या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शंभर कोटी मंजूर केले. तसेच शहरातील ब्रिटीशकालीन कृष्णा नदीवरील नवीन पूलासाठी 15 कोटी निधी दिल्याने आज वाईकरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सामान्य शेतकऱयांना मदतीचा हात देऊन उभे करण्याची गरज आहे. किसनवीर कारखाना चुकीच्या व्यवस्थापनामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱयांचा ऊस जात नाही. पेमंट मिळत नाही. खंडाळा व प्रतापग़ड कारखान्यावर कोटय़ावधीचे कर्ज करून ठेवले आहे. याबाबत आपण लक्ष घालावे. आपण आदेश द्या, काही काळजी करू नका. निवडणूक जिंकून दाखवू असेही ते म्हणाले.
प्रताप पवार यांनी मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी प्रास्ताविकात शहरातील विविध विकास कामांची माहिती दिली व समस्या मांडल्या. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष संजय लोळे, ऍड. श्रीकांत चव्हाण, चरण गायकवाड, राजेश गुरव, किशोर बागुल, संग्राम पवार, प्रदीप चोरगे, कांताराम जाधव, दिपक ओसवाल, सीमा नायकवडी, रेश्मा जायगुडे, प्रियांका डोंगरे, स्मिता हगीर, शितल शिंदे, आरती कांबळे यांनी स्वागत केले.
पंचायत समितीच्यावतीने विक्रांत डोंगरे, बाजार समितीच्यावतीने लक्ष्मण पिसाळ यांनी सत्कार केला. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. भारत खामकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास यावेळी शशिकांत पिसाळ, प्रतापराव पवार, प्रमोद शिंदे, नितीन पाटील, दत्तानाना ढमाळ, ऍड. अरविंद चव्हाण, राजेंद्र राजपुरे, संगीता चव्हाण, राजेंद्र तांबे, बाबूराव संकपाळ, लक्ष्मणराव पिसाळ, संजय गायकवाड, संगीता मसकर, दिलीप पिसाळ, प्रकाश चव्हाण, शारदा ननावरे, रंजना डगळे, सत्यजीत वीर, विक्रांत डोंगरे, विजयसिंह नायकवडी, दिलीप बाबर, वंदना धायगुडे-पाटील, महादेव मसकर, अफझल पठाण, शशिकांत पवार, दिपाली साळुंखे, शिवाजीराव पिसाळ, नीता आखाडे, कांतीलाल पवार, दासबाबू गायकवाड, मदन भोसले, ऍड. उदयसिंह पिसाळ, ऍड. शामराव गाढवे, शंकरराव शिंदे, नानासाहेब कासुर्डे, रमेश गायकवाड, डॉ. अमर जमदाडे, भूषण गायकवाड, अश्विनी पवार, मधुकर भोसले, रजनी भोसले, सुनीता कांबळे, अनिल जगताप, अंजना कदम, मनीषा गाढवे, निखिल सोनावणे, कुंडलिक सावंत, यशवंत जमदाडे, शिवाजीराव जमदाडे, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, पोलिस उपअधिक्षक शितल जाणवे-खराडे, रणजीत पाटील, तहसिलदार रणजीत भोसले, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, बिडीओ नारायण घोलप आदी तसेच सर्व प्रशासन अधिकारी तसेच मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.