पंतप्रधान मोदींची व्हर्च्युअल सभा ः अखिलेश यादव लक्ष्य ः नकली समाजवादी असा उल्लेख
उत्तरप्रदेश निवडणुकीकरता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली सार्वजनिक डिजिटल सभा घेतली असून यात विरोधी पक्षांना त्यांनी जोरदार लक्ष्य पेले आहे. उत्तरप्रदेशात सुधारणा घडवून आणण्यासाठी भाजपला समर्थन देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच त्यांनी चौधरी चरण सिंह यांचा त्यांनी उल्लेख केला आहे. चौधरी चरण सिंह यांनी नेहमीच जनतेत राहू काम केले. परंतु जनतेपासून दुरावलेले नेते आता काय करत आहेत असे प्रश्नार्थक विधान मोदींनी केले. योगी आदित्यनाथ सरकारने गुन्हेगार तसेच माफियांच्या विरोधात केलेल्या कार्याचा उल्लेख त्यांनी सभेदरम्यान केला.
योगी सरकारच्या काळात 5 वर्षांमध्ये सर्वांना सुरक्षा आणि सन्मान देण्याचे कार्य झाले आहे. स्वतःला कायद्यापेक्षा वरचढ मानणाऱया माफिया आणि गुंडांना भाजप सरकारने कायद्याचा अर्थ समजाविला आहे. उत्तरप्रदेशच्या विकासासाठी आम्ही स्वतःला झोकून देत आहोत. तर विरोधक जनतेचा सूड उगविण्यासाठी काम करत आहेत. हा सूड घेणे हीच त्यांची नेहमीपासून विचारसरणी राहिल्याचे म्हणत पंतप्रधानांनी विरोधकांना लक्ष्य केले आहे.
पश्चिम उत्तरप्रदेशातील शेतकऱयांना डोळय़ासमोर ठेवून पंतप्रधानांनी छोटय़ा शेतकऱयांना लाभ मिळवून देणाऱया योजनांचाही उल्लेख केला. केंद्र आणि राज्य सरकार या दिशेने सातत्याने काम करतेय. योगी सरकारने चालू हंगामात ऊस उत्पादकांचे 75 टक्के बिल अदा केल्याचे मोदींनी म्हटले आहे.
दंगलखोरांवर जरब
5 वर्षांपूर्वी उत्तरप्रदेशात दबंग आणि दंगलखोर हेच कायदा होते. त्यांचेच राज्य होते असे म्हणणे गैर ठरणर नाही. 5 वर्षांपूर्वी व्यापाऱयाला लुटले जात होते. मुली घरातून बाहेर पडण्यास घाबरत होत्या आणि माफिया सरकारी संरक्षणात उघड फिरत होते. पश्चिम उत्तरप्रदेश दंगलीच्या आगीत होरपळत असताना अखिलेश सरकार उत्सव साजरा करत होते हे येथील लोक कधीच विसरू शकत नाहीत. 5 वर्षांपूर्वी गरीब, दलित, वंचित मागासांच्या घर, जमीन, दुकानावर अवैध कब्जा हेच समाजवादाचे प्रतीक होते. अपहरण, खंडणीवसुलीने मध्यमवर्गाला उद्ध्वस्त केले होते. 5 वर्षांमध्ये योगी सरकारने उत्तरप्रदेशला अशा स्थितीतून बाहेर काढले असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
अखिलेश यांच्या स्वप्नावर निशाणा
सप अध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी स्वप्नात भगवान श्रीकृष्ण आल्याचे आणि राज्यात सप सरकार येणार असल्याचे सांगितल्याचा दावा केला होता. यावर मोदींनी उपरोधिक निशाणा साधला आहे. जो झोपतो, त्यालाच स्वप्न पडतात. जो जागतो तो संकल्प घेतो. योगी हे जागणारे, जागविणारे नेते आहेत. ते संकल्प करणारे नेते आहेत. हाच फरक उत्तरप्रदेशचे लोक चांगल्याप्रकारे पाहत आणि समजत आहेत. एनसीआरमध्ये सप सरकारच्या काळात भ्रष्टाचार आणि रियल इस्टेट माफियांची आघाडी तयार झाली होती. त्यांनी हजारो फ्लॅट खरेदीदारांच्या आयुष्यभराची कमाई लुटली होती. याचे सर्वात मोठे नुकसान मध्यमवर्गीयांना झेलावे लागल्याचे मोदी म्हणाले.
योगींच्या नेतृत्वावर उमटविली मोहोर
पंतप्रधान मोदींनी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वावर पुन्हा मोहोर उमटविली आहे. एकीकडे भाजपजवळ विकासाचा स्पष्ट व्हिजन आहे, स्वच्छ, प्रामाणिक आणि प्रभावी नेतृत्व आहे. तर दुसरीकडे अहंकारी, समाजाला तोडणारे, कुठल्याही किमतीवर सत्ता प्राप्त करण्याचे स्वप्न पाहणारे आहेत. हे तेच नकली समाजवादी आहेत असे मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी जन चौपाल कार्यक्रमाच्या अंतर्गत पश्चिम उत्तरप्रदेशच्या शामली, मुजफ्फरनगर, बागपत, सहारनपूर आणि गौतमबुद्धनगरच्या मतदारांना संबोधित केले.