अध्याय तेरावा
भगवंतांनी सनकदिकांना सांगितले की, आत्मा अलिप्त असल्याने त्याला जागृती, स्वप्न वा सुषुप्ती या कोणत्याही अवस्था लागू होत नाहीत. बुद्धी मुळात जड आहे त्यामुळे ती एकटी काहीही करू शकत नाही पण तिला आत्म्याकडून चैतन्य शक्ती मिळते आणि त्याआधारे ती नाना प्रकारचे संकल्पविकल्प करू लागते. हे संकल्पविकल्प म्हणजे मायेचेच खेळ असतात पण या बुद्धीच्या खेळांना आत्मा भुलतो आणि बुद्धीने पुढे मांडलेल्या विषयात अडकतो.
ज्याप्रमाणे लोखंड अग्नित तापवून कामगार लोखंडाला हवा तसा आकार देऊ शकतो पण म्हणून अग्नी कर्ता होऊन लोखंडाला आकार देतो असे म्हणता येत नाही. त्याप्रमाणे कर्म करवूनही जीव कर्ता नसतो. तरीपण माणसाच्या स्वभावाशी एकरूप झाल्यामुळे मी कर्ता आहे असे त्याला वाटू लागते.
जीव आपल्या शक्तीने स्वभावाला बळ देत असतो आणि त्या बळाच्या जोरावर माणसाचा स्वभाव जीवाला अनेक प्रकारच्या सात्विक, राजस किंवा तामस अवस्था प्राप्त करून देत असते. सूर्यामुळेच पाणी प्रकाशित होते, त्या पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब दिसत असते. ते पाणी कधी खळाळत असते, कधी हेलकावत असते तर कधी स्थिर असते. त्यानुसार सूर्याचे प्रतिबिंब पाण्याच्या कंपानुसार हेलकावत असते किंवा स्थिर राहते.
सूर्य नेहमी आकाशात असतो. त्याला पाण्याने खाली आणले ! त्याप्रमाणे कुणालाही नादी लावण्यासाठी प्रसिद्ध असलेली वृत्ती तिच्या नावलौकिकाप्रमाणे मुक्तांनाही बद्ध करून दाखवते. माणसाच्या स्वभावामुळे आत्म्याला जीवपण येते, त्या जीवाला जीवपणामुळे देहाची ममता जडते आणि तो प्राप्त झालेल्या सुखदुःखांचा उपभोग घेत असतो. तात्पर्य, वृत्तीच्या संगतीनेच विषयांची आसक्ति वाढते आणि त्यामुळेच जीवाला संसारबंधन प्राप्त होते. अशा रीतीने गुण आणि चित्त ह्यांच्या विषयासक्तीने जरी जीवाला बंधन प्राप्त होत असले तरी वैराग्यभावनेने व गुरूच्या कृपेने विषयवृत्तीला आवर घालावा. आता गुरुकृपेचा चमत्कार ऐक. खरं म्हणजे मी निरंतर तिन्ही अवस्थांमध्ये ज्ञानस्वरूप आणि गुणांपासून अलिप्त आहे माझे ज्ञानस्वरूप व गुणांपासून अलिप्तता टिकून रहावी म्हणून मलाही गुरुकृपा आत्मज्ञानाच्या योगाने अभ्यासाकडे वळवते. अभ्यासाची गोष्ट तर काही विलक्षणच आहे ! आत्मज्ञानाने उपदेशाच्या रूपाने विषयवृत्तीच्या मागेपुढे असलेले माझे ज्ञानस्वरूप अभ्यास दृष्टीला दाखवीत असतो. मी तर सदोदित ज्ञानस्वरूपच असून सर्वांमध्ये सर्वस्वी व्यापलेला आहे. त्यामुळे गुरु हा शिष्याच्या स्वभावाला आत्महितच दाखवून देत असतो. वस्त्र सुताहून पूर्णपणे निराळे करता येत नाही. कारण त्याच्या आतबाहेर सर्व सूतच असते. त्याप्रमाणे ज्या साधकांना विषयांचे भान असते, तेही माझे स्वरूप जाणून असतात. कारण सर्व ज्ञानाचे स्वरूप मीच आहे. त्यात नाम, रूप, वर्ण यांचा भेद नाही. किंवा कर्म, कर्ता अथवा कर्माचा वादही नाही. ॐकारासह वेद माझ्यात सामावलेले आहेत. तेथून भ्रमासह भ्रांती पळून गेली, क्रियेसह प्रवृत्ती गळून पडली, निवृत्ती विरून गेली आणि वृत्ती स्वस्वरूपामध्ये एकरूप होऊन राहिली.
सूर्योदय झाला की तो अंधाराला सर्वस्वी गिळून टाकतो, काजव्याला तर गळा दाबून ठार करून टाकतो व नक्षत्रांचे समुदाय त्वरित नाहीसे करतो. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली की, मायेची स्फुर्ती मावळते, प्रवृत्ती आणि निवृत्ती लज्जेने नाहीशा होतात आणि आत्मानंदाने नित्य तृप्तीच होते. अशी माझ्या स्वरूपाची गोडी जेव्हा साधकांना पूर्णपणे लागून राहते, तेव्हा चित्तही विषयांना सोडते आणि विषयही चित्ताला सोडतो. देठाला लागून जी फळे वाढतात, तीच पिकावयाच्या वेळेला देठापासून वेगळी होतात. देठही त्या फळांना धरून ठेवत नाही. किंवा दही घुसळून लोणी काढले आणि ते पुन्हा ताकात घातले तर ते ताकापासून निराळे राहते. त्याप्रमाणे चित्तही विषयांपासून अलिप्त राहते.
क्रमशः