खरीप हंगाम तोंडावर ; बैलांची खरेदी-विक्री थांबल्याने शेती मशागतीला खीळ
बेळगाव / प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच बाजारपेठा बंद आहेत. याला जनावरांचा आठवडी बाजारदेखील अपवाद नाही. मागील काही दिवसांपासून एपीएमसीमधील शनिवारी भरणारा जनावरांचा आठवडी बाजार बंद आहे. जनावरांची खरेदी-विक्री पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच शेतकऱयांच्या अडचणीत भर पडली आहे.
एपीएमसीमध्ये दर शनिवारी जनावरांचा बाजार भरतो. या बाजारात विविध ठिकाणाहून जनावरे विक्रीसाठी आणली जातात. मात्र, जनावरांचा बाजार बंद असल्याने खरेदी-विक्रीचा व्यवहार ठप्प झाला आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतीची मशागत करण्यासाठी शेतकऱयांची धडपड सुरू आहे. शेती कामासाठी आधुनिक साधनांचा वापर वाढला असला तरी बैलांच्या साहाय्याने शेतीची मशागत करणाऱया शेतकऱयांची संख्या अधिक आहे. या काळात मशागतीबरोबरच पेरणी कामासाठी बैलांच्या मागणीत वाढ होते. दरम्यान, काही शेतकरी नवीन बैलजोडी खरेदी करतात. मात्र, जनावरांचा बाजार बंद असल्याने शेतकऱयांना बैलजोडी खरेदीविना रहावे लागत आहे. परिणामी शेतकऱयांना घरगुती बैलजोडी खरेदीकडे लक्ष द्यावे लागत आहे. गतवषीप्रमाणे यंदादेखील खरीप हंगामाच्या तोंडावर बाजार बंद झाल्याने स्वतःची बैलजोडी नसणाऱया शेतकऱयांसमोर अडचणी वाढल्या आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱया बाजारात आजूबाजूच्या ग्रामीण भागातून शेतकरी मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्रीसाठी जनावरे आणत असतात. बाजारात बैलजोडय़ांबरोबरच जातीवंत गायी-म्हशींची विक्री होते. त्यामुळे मोठी उलाढालही होते. मात्र बाजार बंद असल्याने शेतकऱयांना जातीवंत जनावरांच्या खरेदी-विक्रीपासून दूर रहावे लागले आहे.