शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांचा गौप्यस्फोट,
वार्ताहर/ चिपळूण
मुंबई रेड झोनमध्ये असतानाही अनेक चाकरमानी चोरवाटेने जिल्हय़ात प्रवेश करत आहेत. त्यांच्यामुळेच जिह्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून जिल्हा प्रवेशासाठी काही ठिकाणी आर्थिक देवाण घेवाण होत असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी शुक्रवारी केला. चाकरमानी आपलेच बांधव आहेत. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून त्यांना सहकार्य करायला हवे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राउत यांनी ग्रामीण भागातील लोकांसाठी चिपळूण पंचायत समितीला आणखी 5 हजार मास्क दिले आहेत. एकूण 15 हजार मास्क देण्याचे राउत यांनी आश्वासन दिले होते. त्यापैकी गेल्या महिन्यात 10 हजार तर उर्वरित 5 हजार मास्क त्यांनी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्याकडे पाठवले होते. हे मास्क सभापती धनश्री शिंदे यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जिल्हय़ात कोराना बाधित रूग्णांच्या वाढत्या संख्येवर त्यांनी चिंता व्यक्त केली. मुंबई, पुणे येथील बहुतांशी भाग हॉटस्पॉट बनले आहेत. जिल्हय़ात सध्यस्थितीत आढळून येणाऱया कोरोनाबाधित रूग्णांची ट्रव्हल हिस्ट्री मुंबई असल्याचे समोर येत आहे. यातील काहीजण चोरवाटेने जिल्हय़ात प्रवेश करत आहेत. त्यांच्यामुळेच रूग्णांची संख्या वाढली आहे. काही ठिकाणी तर जिल्हय़ात प्रवेश करण्यासाठी चाकरमान्यांकडून पैसे मोजले जात आहेत. अशा प्रकारांबाबत आपण प्रशासनाला माहिती दिल्याचे कदम यांनी सांगितले.
शहरातील काही भाजी व्यावसायिकांमार्फंत शिवनदी पुलाखाली मोठय़ा प्रमाणावर कुजलेल्या भाज्या, कचरा व घाण टाकली जात असल्याने विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम आक्रमक झाले. शिवनदी प्रदुषणाबाबत चिपळूण नगर परिषदेने नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे, विभागप्रमुख संदीप राणे, निहार कोवळे, माजी नगरसेवक विकी नरळकर, महेश कांबळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.