अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार, 21 जुलै 2021, दुपारी 12.15
● 1021 नवे रुग्ण● वातावरणातील बदलाने आजार वाढले ● लसीकरणासाठी नोंदणीच्या अटीने गैरसोय वाढली ● पॉझिटिव्हिटी 8.45 टक्के
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात मंगळवारी रात्री आलेल्या अहवालामध्ये 1012 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांत रुग्ण संख्येत घट झालेली असताना मंगळवारी रात्री आलेल्या अहवालात पुन्हा हजारावर रुग्ण वाढ झाली आहे.
जिल्ह्याचा आकडा कमी होईना
दुसऱ्या लाटेची गती राज्यभरात कम होत असताना सातारा जिल्ह्यात मात्र आकडे कमी होण्याचे नाव घेत नाहीत. गेले महिनाभर सातशे ते आठशे या दरम्यान रुग्ण वाढ कायम असून, कधीकधी हा आकडा एक हजारावर जात आहे. पॉझिटिव्हिटी रेटही स्थिर असून तोही कमी होत नसल्याने जिल्ह्यात कडक निर्बंधांना जनतेला सामोरे जावे लागत आहे. अत्यावश्यक सेवेमधील दुकानांमध्ये खरेदीसाठी होणारी गर्दी तसेच रस्त्यावरील गर्दी कोरोनाचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरत आहे.
वातावरणातील बदलांमुळे आजार वाढले
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पश्चिम भागात पाऊस सुरू आहे. दिवसभर सूर्यदर्शनही काही ठिकाणी होत नाही. या वातावरण बदलामुळे सर्दी, ताप खोकलाचे रुग्ण वाढू लागले आहेत. यातच चिकुनगुनिया आणि डेंग्यूच्या आजाराचेही स्थानिक आव्हान प्रशासनासमोर आहे.
लशीसाठी नोंदणीच्या अटींमुळे गैरसोय वाढली
जिल्ह्यात लसीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अजूनही गती आलेली नाही. यातच गेल्या काही दिवसात लसीकरणासाठी नोंदणी लागू केल्याने ज्येष्ठ नागरिक तसेच महिला यांची गैरसोय होऊ लागली आहे. यापूर्वी केंद्रात रजिस्ट्रेशन सुरू होते. त्यावेळी केंद्रावर जाऊन रजिस्ट्रेशन करून घेता येत होते. मात्र आता अगोदर रजिस्ट्रेशन करण्यास सांगण्यात येत आहे. मात्र हे करताना रजिस्ट्रेशन होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. तसेच लसीकरण केंद्रांवर गर्दी कमी झाल्याचे दिसत आहे.
बुधवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमूने 12,83,860, एकूण बाधित 210904, एकूण कोरोनामुक्त 1,97,556, मृत्यू 5,088, उपचारार्थ रुग्ण 10,330
बुधवारी जिल्हय़ात बाधित 1012, मुक्त 628, मृत्यू 34