ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन
प्रतिनिधी /बेळगाव
या जगात ज्ञानाशिवाय माणूस सुखी होवू शकत नाही. ज्ञान म्हणजे शिक्षण घेऊन मिळालेल्या ढीगभर पदव्या नव्हेत. तर अनुभवानी आलेले शहाणपण आणि माणुसकीच्या भावनेतून इतरांसाठी केलेली मदत आणि सद्वर्तनातून निर्माण केलेला आदर्श होय, असे विचार ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांनी व्यक्त केले.
बेळगाव श्री हरी विठ्ठल-रुक्मिणी अभिवृध्दी वारकरी सेवा संघ आयोजित पारायण सोहळय़ामध्ये रविवार दि. 14 रोजी रात्री इंदोरीकर यांचे कीर्तन झाले. वडगाव येथील आदर्श शाळेच्या मैदानावर झालेल्या या कीर्तनास नागरिकांनी अलोट गर्दी केली.
ते म्हणाले, मुलाला शिक्षण देण्यासाठी बाप बायकोचे दागिने विकतो पण नोकरीला लागल्यानंतर तोच मुलगा बापाला भाकरी देवू शकत नसेल आणि बापाच्या डोळय़ात अश्रु आणत असेल तर त्या शिक्षणाची त्या मुलाची किंमत शुन्य आहे. नवऱयाच्या पगाराची अपेक्षा करणारी बायको सासुची सेवा करण्यास नाकारता हा आपला धर्म नव्हे. धर्म म्हणजे मोबाईलवर बोलत राहणे, नको ती चित्रे पाहणे किंवा धाब्यावर जाऊन घोट घेत चकना खाणे नक्हे. धर्म टिकविण्यासाठी वारकरी सांप्रदायाची गरज आहे.
जे गायीला दररोज पाणी देतात, तुळशीच्या रोपाला पाणी घालतात, वारकऱयांसमोर नतमस्तक होतात आणि काळय़ा आईची सेवा करतात त्यांचे कष्ट कधीही वाया जात नाहीत. जगाच्या पाठिवर पहिला संप्रदाय वारकरी संप्रदाय असून त्याचा पाया ज्ञानदेवांनी घातला आहे. जेथे शांती आहे तेथे दया आहे. जेथे ज्ञान आहे तेथे देव आहे. या जगात ज्ञानाविना माणूस सुखी होवू शकत नाही. त्यामुळे नेमके ज्ञान म्हणजे काय? हे जाणून घेतले पाहिजे. त्यासाठी वारकरी आणि पारायण सोहळय़ांची या समाजाला आजही गरज आहे, असेही ते म्हणाले. सदर पारायण सोहळय़ासाठी भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष किरण जाधव यांनी पुढाकार घेतला.