उम्मीद पे दुनिया कायम है…. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठाऊक नसावे. त्यामुळे आजच्या घडीला त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंडळी नाराज आहेत. मनासारखे ‘खाते’ मिळाले नाही म्हणून अनेक मंडळींच्या नाराजीला उधाण आलेले आहे. त्यातील एका मंत्रिमहोदयांनी राजीनामा दिल्याची बातमीही एक दिवस चालली होती. नंतर ही बातमी म्हणजे ‘पुडी’ आहे असेही त्या मंत्रिमहोदयांनी सांगितले. मंत्रिमंडळात आपला समावेश झाला नाही म्हणूनही खुद्द शिवसेनेचे काही आमदार, माजी मंत्री नाराज असल्याची बातमी होती. काहींनी ती बोलून दाखवली, काहींनी पक्षशिस्त पाळली. राष्ट्रवादीतील नाराज मंडळींनीही पवारांच्या भयाने का होईना शिस्त पाळली. काँग्रेसमधील अशोकरावच नाराज असल्याने त्यांनी घालायचा तो घोळ घातलाच. त्यामुळे खातेवाटपाला विलंबही खूप झाला. या सगळय़ा परिस्थितीवर भाष्य करताना भाजपच्या नेत्यांनी नवीन इंग्रजी वर्षाला खातेवाटप झाले असले तरी गुढीपाडव्याला सुरू होणाऱया नवीन वर्षात हे सरकार सत्तेवर नसेल असे जाहीरही करून टाकले. देवेंद्र फडणवीस यांच्यापासून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंतचे यच्चयावत भाजप नेत्यांनी भविष्यवाणीही केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार असताना आपापसातील कुरघोडीतूनच या राज्याची सत्ता गमावल्याचे दाखलेही लोक द्यायला लागले. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस या अलीकडच्या काळातील मुख्यमंत्र्यांच्या काळातील विविध किस्स्यांची आणि नाराजांची चर्चाही रंगू लागली. कोणत्या नाराजाला कोणते औषध दिले गेले आणि कोणाला कशी फुटाची गोळी दिली. कोणाला श्रेष्ठींच्या दारात येरझाऱया घालायला लावल्या गेल्या आणि कोणाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला, कोणाच्या फाईल्स कोणी-कोणाला पोहोच केल्या यावर बरीच खलबते झडू लागली. अशावेळी प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या तोंडी घोळणारे ‘लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल’ या सदाहरित वक्तव्याचीही उजळणी झाली नसती तरच नवल! तर नाराजांना आणि बंडोबांना थंडोबा करणारे असे हे सदाहरित वाक्य आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपयोगात आणता येणार नाही. उद्धव ठाकरे यांचे चुकलेच. आशेच्या झोपाळय़ावर झोके घेत निराशेला मागे टाकणाऱया मंडळींना त्यांनी तेवढीही जागा ठेवली नाही. राज्याच्या मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याची भरती न करता खुर्ची रिकामी ठेवली असती तर ‘लवकरच…..’ या एका शब्दावर समस्त मंडळी आनंदी राहिली असती. आपल्याला मंत्री व्हायचे असेल तर मोठी स्पर्धा आहे आणि आपल्या प्रतिस्पर्धी आमदाराला काही केल्या यशस्वी होऊ द्यायचे नाही या ईर्षेने सारी मंडळी एकमेकाच्या लफडय़ा, कुलंगडय़ांना उघड करण्याच्या कामाला जुंपली असती. आपलेच नाव कसे चर्चेत राहील याच्यासाठी खटाटोप करण्यात वेळ खर्ची घालावा लागला असता. त्यामुळे त्यांना नाराज होण्यासाठी वेळही मिळाला नसता. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि कदाचित झोपेत सुद्धा ते राजकीय खेळय़ा रचत राहिले असते. इतके सारे केल्यानंतर आपण मंत्री नक्की होऊ या आशेवर बहुतांश मंडळी जगली असती. विलासराव ते देवेंद्र फडणवीस सर्वांनी ‘लवकरच….’ या एकाच वाक्याचा वारंवार उपयोग करून आपली खुर्ची टिकवली. भक्कम केली. पण, त्यांचा ‘लवकरच’ कधीही उगवला नाही. उगवलाच तर तो, सरकारच्या शेवटच्या पाच किंवा सहा महिन्यांसाठीच उगवला. काही मंडळींना घरी बसवण्याची आणि काहींना संधी देऊन उपकार केल्याची भावना निर्माण केली गेली. या सर्व कारभारात काही पक्षांच्या श्रेष्ठींचेही भले झाले. पण, हे सगळे आपल्या डोळय़ादेखत घडलेले असूनही उद्धव ठाकरे यांनी मात्र ती संधी गमावली. हे त्यांचे चुकलेच. लोकांना खोटी आश्वासने द्यायची असतात आणि आमदारांना खोटय़ा आश्वासनावर झुलवायचे असते हे त्यांना कोणी सांगितले नाही बहुदा. मंत्रिमंडळातील सगळय़ा खुर्च्या भरल्यानंतर आता आपल्याला मंत्रीपद मिळणारच नाही हे बहुतेकांनी गृहीत धरले आणि त्यामुळेच नाराजांचे पीक फोफावले. या नाराजांना राजी करायला आता काही नवी युक्ती ठाकरे यांना शोधावी लागेल. कदाचित आम्ही जंबो मंत्रिमंडळ करू पण कोणाला नाराज करणार नाही असे तिन्ही पक्षापैकी कोणी बोलते का हे पहावे लागेल. किंवा नाराजांपैकी कोणाला खरोखरच मंत्रीपदाचा त्याग करावा असे वाटत असेल तर त्यांची खुर्ची रिकामी ठेवणे उद्धव ठाकरे यांना शक्य आहे. पण, ती संधीही त्यांनी साधली नाही. नाराज असलेल्या मंत्री महोदयांना मात़ोश्रीवर बोलून समज देण्यात आली. अशी समज कोणी देतात का? नाराज असतील, राजीनामा द्यायला तयार असतील तर किमान ‘लवकरच….’च्या प्रयोगासाठी तरी त्यांना खुर्ची रिकामी करू द्यायला पाहिजे होती. लोकांच्या आशा, आकांक्षा काय आहेत हे जसे नेत्याने जाणावे लागते तसेच आपल्या आमदारांच्याही आशा, आकांक्षा काय आहेत हे ठाकरे यांनी जाणले पाहिजे. मोघमात बोलणे राजकारण्यांच्या फायद्याचे असते. बाळासाहेब थोरात यांनी पहा कसा आपल्या पद्धतीने काँग्रेसमधील नाराजीवर तोडगा काढला आहे. ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही त्यांचा ‘उचित सन्मान’ राखला जाईल…. असे त्यांनी सांगून टाकले आहे. या वक्तव्यानंतरच्या रात्री थोरात निर्धास्तपणे झोपले असतील. कारण, ‘उचित सन्मान’ म्हणजे काय असे कोणी त्यांना विचारायला जाणार नाहीत. ज्यांनी विचारायचे ते आशेच्या झोक्यावर झोके घेऊही लागले आहेत…! आशेवर जगणाऱया माणसांच्या आशा पूर्ण करणे हे राजकारणातले उद्दीष्ट नसतेच. त्यांना आशेवर जगू देणे आणि आपण निराश न होणे यासाठी शोधलेला हा राजमार्ग आहे. राजकारणात असे राजमार्ग सरळमार्गी नेत्यांनीही आत्मसात केले पाहिजेत. म्हणूनच आम्ही म्हणतो, ठाकरे चुकलेच. त्यांनी ही चूक सुधारली पाहिजे! राज्यातील सर्व आमदारांना कोणते ना कोणते पद देऊ केले तरीही त्याची नाराजी दूर होईल असे नाही. त्यामुळेच काहींना महामंडळे, काहींना कंत्राटे तर काहींना अनुदान, कर्जांना थकहमी देऊन हे राज्य अडचणीत आले. प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी ते आपापल्या पद्धतीने अधिकाधिक कर्जबाजारी झाले तरी चालेल पण, लोकहिताला बाधा येऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. ठाकरे या सर्वांहून वेगळे वागायला गेले. चुकलेच त्यांचे.
Previous Articleभाषेच्या अंगाखांद्यांवर
Next Article शिरोळमध्ये कनिष्ठ लिपीक लाचलुचपतच्या जाळ्यात
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.