तरूण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग
बुधवारी असणारा आठवडी बाजार प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर सात महिन्यानंतर सुरू झाला. त्यामुळे शेतकरी, व्यापारी व नागरिक यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे.
वैराग बाजारपेठ ही सत्तावन्न गावांशी जोडलेली असून वैरागचा बुधवारचा आठवडी बाजार सोलापूर जिल्ह्यात मोठा समजला जातो. या बाजारासाठी लांब लांबून सर्व प्रकारचे व्यापारी येतात. वैरागमध्ये भरणाऱ्या बाजार दिवशी शेळी, मेंढी, गुरांचा, कातडी, मास, मच्छी, कोंबड्यांचा, भाजीपाला, किराणा व कपड्यांचा भव्य मोठा बाजार एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र भरतो. वैराग भागातील सत्तावन्न खेड्यातील लोक या आठवडी बाजारामध्ये विविध वस्तू, बैल बारदाना, भाजीपाला, किराणा खरेदीसाठी आवर्जून येत असतात. या दिवशी वैरागमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार होऊन आर्थिक उलाढाल होत असते. परंतु गेले सात महिने कोराना महामारीमुळे सर्व जग ठप्प झाल्याचे दिसून आले होते.
सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू असून सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर आदी कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांचा वापर करत आठवडी बाजारास प्रशासनाकडून परवानगी मिळाल्याने वैराच्या व्यापाऱ्यांनी कोरोनाची काळजी घेत व्यापार सुरू केल्याचे दिसून येते आहे.