पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांशी चर्चा :
वृत्तसंस्था/ चेन्नई
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले निवार चक्रीवादळ आता अधिकच वेगवान झाले आहे. हवामान विभागाने निवार आता धोकादायक चक्रीवादळात रुपांतरित होण्याचा अनुमान व्यक्त केला आहे. बुधवार दुपार ते संध्याकाळदरम्यान तामिळनाडू आणि पुड्डुचेरीच्या किनाऱयावर हे चक्रीवादळ धडकू शकते. निवार चक्रीवादळासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तामिळनाडू आणि पुड्डुचेरीच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. मोदींनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
चक्रीवादळ येण्यापूर्वीच तामिळनाडू आणि पुड्डुचेरीच्या अनेक हिस्स्यांमध्ये पाऊस पडू लागला आहे. हवामान विभागाने बुधवारी अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावाने 100 ते 150 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहू शकतात.
तटरक्षक दलाच्या नौका तैनात
चक्रीवादळ पाहता बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्वेत तामिळनाडू आणि पुड्डुचेरीच्या किनाऱयानजीक तटरक्षक दलाच्या 8 नौका आणि 2 विमाने तैनात करण्यात आली आहेत. त्यांच्या माध्यमातून जहाजे आणि मासेमारी करणाऱया नौकांना वादळाचा इशारा दिला जात आहे. एनडीआरएफची पथके लोकांना प्रतिकूल हवामानापासून बचावाचे उपाय सांगत आहेत.
एनडीआरएफची 30 पथके तयार
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) महासंचालक एस. एन. प्रधान यांनी निवार चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू, पुड्डुचेरी आणि आंध्रप्रदेशात तटरक्षक दलाची 12 पथके तैनात करण्यात आल्याची माहिती दिली आहे. या राज्यांमध्ये एनडीआरएफच्या 18 पथकांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.
मच्छिमारांना सूचना
हवामान विभागाने तामिळनाडू आणि पुड्डुचेरीच्या किनारी भागांमध्ये चक्रीवादळासंबंधी इशारा दिला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याची सूचना करण्यात आली आहे. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना परत आणले जात आहे. तामिळनाडूच्या नागापट्टणम आणि कराईकल क्षेत्रांमध्ये एनडीआरएफची 6 पथके दक्ष आहेत.
4 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडू, पुड्डुचेरीसोबत आंध्रप्रदेश, तेलगंणातही अतिवृष्टी होऊ शकते. हवामान विभागाने यासंबंधीचा इशारा दिला आहे. 24, 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी तेथे अतिवृष्टी होण्याचा अनुमान आहे.