भारत एक जागतिक शक्ती झाला आहे असे अचाट दावे अलीकडील काळात केले जात असले तरी अफगाणिस्तानमध्ये मोदी सरकार तोंडावर आपटले आहे असे जाणकार मानतात.
काबुल एखाद्या पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. अमेरिकेला वाटले होते की अश्रफ घनि सरकार काही महिने तरी आरामात तग धरेल. पण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी फौजा माघारी नेल्या आणि पत्त्यांचा बंगला जवळजवळ क्षणार्धात कोसळला. तालिबानने अफगाणिस्तानवर अचानक केलेल्या या कब्जानंतर भारत एका दुर्गम खिंडीत अडकला आहे. एकप्रकारे चारी बाजूनी शत्रूंनी वेढला गेल्याने भारताची कोंडी झालेली आहे. अफगाणिस्तानातील या सत्ता बदलामुळे भारताकरता शेजारीच एक ‘दुसरा पाकिस्तान’ निर्माण झाला आहे. पाकिस्तानमध्ये दिवाळी साजरी होत आहे. तालिबानला दहशतवादी ठरवून भारताने त्या संघटनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवलेला नाही.
अफगाणिस्तानातील घटनांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर आव्हानाचा नवा डोंगर उभा राहिला आहे असे मानले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. या सत्ताबदलात पाकिस्तान, इराण, चीन आणि रशिया या भारताला पाण्यात पाहणाऱया राष्ट्रांनी एकप्रकारे संगनमताने भारताचा काटा काढला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत हा अमेरिकेच्या फारच कच्छपी लागल्याने तालिबानच्या रूपाने या राष्ट्रांनी एक मोठा राक्षस उभा केला आहे. भारत एक जागतिक शक्ती झाला आहे असे अचाट दावे अलीकडील काळात केले जात असले तरी अफगाणिस्तानमध्ये मोदी सरकार तोंडावर आपटले आहे असे जाणकार मानतात. भारताने अमेरिकेचा पदर पकडला आणि अफगाणिस्तानात दोघांचीही नाचक्की झाली.मोदी पंतप्रधान झाल्यापासून अफगाणिस्तान संबंधातील ‘ग्रेट पॉवर गेम’ च त्यांना समजला नाही आणि एका अर्थाने दक्षिण आशिया आणि मध्य आशियातील बदलते वारे त्यांच्या लक्षात आले नाहीत असे जाणकारांना वाटते. आपण एक जागतिक मुत्सद्दी आणि कणखर नेता अशी प्रतिमा बनवण्याच्या नादात मोदींना भारताच्या आजूबाजूला नक्की काय राजकारण शिजत आहे हे कळलेच नाही. तालिबान म्हणजे पाकिस्तान लष्कराने मोठे केलेले सैतानी अपत्य आहे. मध्ययुगीन कालात वावरणारे हे हिंस्त्र श्वापद आता भारताच्या दारात आलेले आहे आणि भारताला त्याने बेसावध पकडले आहे. ‘त वरून ताकभात’ ओळखू शकणाऱयांना हा एक टेलर आहे.
पिक्चर अभि बाकी है
अडीच वर्षांपूर्वीपर्यंत भाजपच्या सक्रिय पाठिंब्यामुळे जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री राहिलेल्या मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी सरकारने काश्मीर खोऱयात राजकीय स्थैर्य आणि शांती लवकरच प्रस्थापित केली नाही तर हे खोरे हातचे कसे निसटेल हे समजणारदेखील नाही असा इशारा दिलेला आहे तो बोलका आहे. दोन वर्षांपूर्वी वादग्रस्त 370 कलम हटवून जम्मू आणि काश्मीरचा राज्य दर्जा घालवून त्याला एक केंद्रशासित प्रदेश बनवल्यापाससून काश्मीर आतून खदखदत आहे. राजकीय स्थैर्य आणायला स्थानिक नेतृत्वाबरोबर केंद्राने अजून म्हणावेसे काम केलेले नाही. मेहबूबा, फारूक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला या माजी मुख्यमंत्र्यांना बराच काळ स्थानबद्ध केले गेले होते. थोडक्मयात काय भारताने आपले घरच एकसंध राखलेले नाही. अशा नाजूक काळात लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए–मोहम्मद यांच्या हालचाली मोठय़ा प्रमाणावर वाढणार आणि त्यांना तालिबानकडून आधुनिक शस्त्रात्रे मिळणार अशी चिंता संरक्षण विषयातील तज्ञ मंडळी करू लागली आहेत. पन्नास वर्षांपूर्वी बांगलादेशची निर्मिती करून पाकिस्तानचे दोन तुकडे केल्यापाससून भारताला सतत ठिकठिकाणी रक्तबंबाळ करून कमकुवत करण्याची नीती इस्लामाबादने बाळगली आहे. तिला ‘ब्लीड इंडिया विथ थाउझन्ड कट्स’ असे संबोधिले जाते. तालिबानने काबूलमधील सत्ता हस्तगत केल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान म्हणूनच उडय़ा मारायला लागलेले आहेत. चीनने लडाख भागात केलेली घुसखोरी अजून मागे घेतलेली नाही. चर्चेची बरीच गुऱहाळे झडूनही काही मोक्मयाच्या भागात त्याने बस्तान मांडलेलेच आहे. शी जीन पिंग या चीनच्या सर्वोच्य नेत्याला येन केन प्रकारेण भारताची ही भूमी बळकवायची आहे.
अमेरिकेवर जो भरवसा करतो तो शेवटी तोंडघशी पडतो हे वारंवार दिसून आले आहे. मोदींनादेखील आता ते कळले असले तरी त्याला फार उशीर झाला आहे. ‘बिबटय़ा त्याचे डाग बदलत नाही’ या न्यायानुसार तालिबान हे आता खूप सुधारले आहे आणि पूर्वीसारखे ते रानटी राहिलेले नाही असा बराच प्रचार झाला असला तरी त्यात तसूभरही सत्य नाही. सध्या आंतरराष्ट्रीय समुदायाकडून समर्थन मिळाल्याशिवाय आपल्याला सत्ता राबवता येणार नाही हे तालिबान जाणून असल्याने शेळीच्या कातडीतील छुप्या कोह्याप्रमाणे तो सामोपचाराच्या थापा मारत आहे. तात्पर्य काय तर एकीकडे कोविड महामारीने देशभर उडालेला हाहाकार तर त्या अगोदरपासून झालेली अर्थव्यवस्थेची नाजूक अवस्था याने लाखो लोक मरण पावले आहेत आणि करोडोंच्या नोकऱया गेल्या आहेत. अशावेळी एक नवीन शत्रू दाराशी उभा आहे. चीन आणि पाकिस्तानची अमंगळ युती भारताला खिळखिळे करण्याच्या कामी लागली असताना तालिबानच्या रूपाने त्यांना एक नव्या दमाचा गडी भेटला आहे. या तीन असुरांना एकीकडून रशियाची साथ आहे तर दुसरीकडून इराणची. भारताच्या राशीत एवढे सारे अमंगळ ग्रह बऱयाच दशकात आलेले नव्हते. अफगाणिस्तानमधील सत्ता बदलाने जगात आपली दादागिरी वाढवणारा चीन कराची आणि काबुलमधून मध्य आशियात घुसेल. आपली बाजारपेठ वाढवून चीनला अमेरिकेला जागतिक महासत्तापदावरून हटवायचे आहे.
अफगाणिस्तानमध्ये बेसावध पकडले जाणे ही आंतरराष्ट्रीय मामल्यात मोदींची दुसरी मोठी चूक ठरेल. चीनने केलेली घुसखोरी ही पहिली मोठी चूक होय. तालिबान प्रश्नावर जागतिक रंगमंचावर असहाय दिसणाऱया मोदीनी अफगाणिस्तानचा मुद्दा देशात भाजपाची राजकीय पकड वाढवण्यासाठी वापरणे सुरू केले आहे. धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा खेळ सहा-सात महिन्यात विधानसभा निवडणूक होत असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपने जोरदारपणे चालवला आहे. या अशा राजकारणाने भाजपचे निवडणुकीत कितपत कल्याण होईल ते येत्या काळात दिसेल पण त्याने राष्ट्रीय एकात्मतेला मात्र तडा जाणार आहे. अफगाणिस्तान प्रश्नावर देशातील मुस्लिम समाजाला एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला तर काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, आसाम तसेच केरळमध्ये एक वेगळे तालिबान निर्माण होईल, जे देशहिताला मारक ठरेल. मोदी चुकांवर चुका करू लागले असताना विरोधी पक्ष हळूहळू एकत्र येऊ लागले आहेत ते सोनिया गांधींच्या 19 पक्षनेत्याबरोबरील बैठकीने दिसून आले. गेल्या आठवडय़ात एका सरकारधार्जिण्या वृत्तवाहिनीने पंतप्रधानांची लोकप्रियता 66 टक्क्यांवरून 24 टक्क्यावर घसरली आहे असे पाहणीअंती सांगितले होते. त्यात कितपत तथ्य आहे हे काळ दाखवेल पण भाजप हादरला आहे हे मात्र खरे.
सुनील गाताडे