मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे वाहतुकीला अडथळा : तातडीने डागडुजी करणे गरजेचे
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. एकीकडे स्मार्ट सिटी अंतर्गत काँक्रिटचे रस्ते केले जात असताना दुसरीकडे मात्र शहराच्या प्रवेशद्वारावरच खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, वाहने कशी चालवायची, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. रस्त्याची चाळण झाली असून एखाद्या निष्पापाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तिसऱया रेल्वे गेटजवळ पावसाळय़ामध्ये मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्डय़ांमध्ये पेव्हर्स बसविण्यात आले होते. परंतु अवजड वाहनांमुळे सर्व पेव्हर्स उखडून बाजुला पडले आहेत. यामुळे पुन्हा खड्डय़ांनी रस्त्यांवर तोंड वर केले. खड्डे पडून देखील त्या रस्त्याची डागडुजी अद्याप करण्यात आलेली नाही. रात्रीच्या वेळी तर खड्डे निदर्शनास न आल्यामुळे अपघातही घडत आहेत. खड्डे चुकविताना अनेकजन जखमी झाले आहेत. परंतु खड्डे बुजविण्यास मात्र प्रशासनाचा कोणताच विभाग पुढे येताना दिसत नाही.
खड्डय़ांमुळे वाहनांच्या रीघ
उद्यमबाग येथील औद्योगिक वसाहतीला जाण्यासाठीचा हा एक प्रमुख मार्ग आहे. दररोज शेकडो कामगार व मालवाहू वाहने या मार्गावरून जातात. परंतु रस्त्याची अवस्था मात्र दयनीय झाली असल्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या खड्डय़ांमुळे वाहनांच्या रांगा लागत असून, या खड्डय़ांची डागडुजी करणे आता गरजेचे बनले आहे.