शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच ते सहा वर्षांत दुप्पट करण्याची केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी विविध योजनाही सुरू करण्यात आल्या आहेत. तथापि उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील काही शेतकऱ्यांनी उत्पन्न दुप्पट करण्याचा मार्ग स्वतःचा स्वतःच शोधून काढला आहे. त्यांनी पारंपरिक खत आणि किटनाशकांच्या आधारावर चाललेली आतबट्ट्यातील शेती सोडून सेंद्रिय शेतीचा आधार घेतला आहे. त्यातून त्यांचे उत्पन्न अवघ्या तीन वर्षांत दुप्पट झाले आहे.
या संकल्पनेचे अध्वर्यु आहे बेलउर खेड्यातील रहिवासी महेंद्र यादव. त्यांनी सेंद्रिय शेतीत स्वारस्य असणाऱया एक हजार शेतकऱयांची संघटना बनविली आहे. या संघटनेत दोन एकरपासून दहा एकरपर्यंत शेती असणारे सदस्य आहेत. सध्या लोक आपल्या शरीरस्वाथ्याविषयी जागृत झाले असून त्यांनी आपल्या आहारात सेंद्रिय पिकांपासून बनविलेल्या पदार्थांचे प्रमाण वाढविले आहे. त्यामुळे सेंद्रिय कृषी उत्पादनांना मागणी आणि किंमत चांगली आहे. याचा लाभ उठवून या एक हजार शेतकऱ्यांनी महेंद्र यादव यांच्या नेतृत्त्वात सेंद्रिय शेतीची सुरुवात केली आहे. शिवाय त्यांनी पूर्वापारपासून चालत आलेली पिके घेण्यास प्रारंभ केला आहे. काळा तांदूळ, काळा गहू, रान भाज्या, लिंबू, औषधी वनस्पती इत्यादींसह सेंद्रिय गूळ, मध इत्यादीचे उत्पन्नही ते घेतात. काहींनी शेततळे तयार करून मासे उत्पादनही सुरू केले आहे. शेतीची पद्धती बदलल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहे.