उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर राजकारणातील रंग झपाटय़ाने बदलू लागतील असे अंदाज होत आहेत. घोडामैदान जवळच आहे. 2024 ची लढाई कशी होणार ते 2022 मध्ये ठरणार आहे. भाजप राष्ट्रीय पातळीवर एकाकी पडू लागला आहे हे सत्ताधाऱयांसाठी खचितच चांगले चिन्ह नाही.
लखीमपूर खेरी प्रकरणाने वणवा पेटला आहे. 4-5 महिन्यांवर आलेल्या उत्तर प्रदेशमधील निवडणुकात काय होणार यावर पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजप आणि नरेंद्र मोदी सरकारची वाटचाल दमदार राहणार की ढिली पडणार हे ठरणार आहे. लखीमपूर खेरीमधील शेतकऱयांवरील हिंसाचाराबाबत केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील गहजब उडाल्याने उत्तर प्रदेशचे ‘दमदार’ मुख्यमंत्री सत्ताधाऱयांचाच दम काढत आहेत अशा कुजबुजीला राजकीय वर्तुळात सुरुवात झाली आहे. योगी आदित्यनाथ हे साधे प्रकरण नव्हे याची जाणीव मोदींबरोबर गृह मंत्री अमित शहा यांना दिवसेंदिवस होऊ लागली आहे. पण मांजराच्या गळय़ात घंटा कोणी बांधायची अशीच काहीशी बात आहे. योगी केवळ दबंगच आहेत असे नव्हे. ते भगवे धारण करणारे असल्याने हिंदुत्वाची पताका झळकावणाऱया मोदी-शहा यांना सबुरीने घ्यावे लागत आहे.
लखीमपूर खेरीतील हिंसाचारात आठ जणांच्या झालेल्या मृत्यूनंतर सर्वोच्च न्यायालयालादेखील झाल्या प्रकाराची स्वतःहून दखल घ्यावी लागावी याचा अर्थच जी घटना घडली ती अतिशय क्रूर व मानवतेला काळिमा फासणारी होती. विरोधकांच्या नावाने कायम शंख करत राहणाऱया उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना एका दिवसात या घटनेचा तपास करण्यासाठी आयोग नेमावा लागला. हरीश साळवे यांच्यासारखा कसलेला वकील देऊनदेखील उत्तर प्रदेशला न्यायालयाने चांगलाच जमालगोटा दिला. झाल्या प्रकाराबाबत पंतप्रधानांनी अजूनही अवाक्षर न काढल्यामुळे विरोधी पक्षांचे फावले नसते तरच नवल होते. या हिंसाचारामुळे विरोधी पक्षांना एक चांगला मुद्दा हाती लागला आहे. जोपर्यंत वादग्रस्त केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होत नाही तोवर तरी हा मुद्दा एक राष्ट्रीय मुद्दा म्हणून राहणार आहे. भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्याला तो किती काटणार आणि विरोधी पक्षांना कशा प्रकारे जवळ आणणार त्यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे.अमित शहा यांचे वेगळेच राजकारण सुरू आहे. झाल्या गेल्या प्रकारामुळे योगी निपटले गेले तर त्यांना हवेच आहे. महत्त्वाकांक्षी योगेंमध्ये जहाल हिंदुत्ववाद्यांना मोदींचा नैसर्गिक वारस दिसत असल्याने शहा यांनी सोयीस्कर मौन साधले आहे. उत्तर प्रदेशात भाजप एकसंध राहणार नाही आणि एकदिलाने काम करणार नाही याची चुणूक सध्याच्या वातावरणात दिसत आहे. शहा-मोदी यांना मिश्रा यांना नारळ द्यायचा नसल्याने योगी अस्वस्थ झाले आहेत.
कोणाला आवडो अथवा नावडो, पण आंदोलक शेतकऱयांचे नेते राकेश टिकैत हे उत्तरेत भाजपकरता बागुलबुवा बनले आहेत. दशकापूर्वी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने तत्कालीन काँग्रेस राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडले होते. तसेच काम आता टिकैत आणि मंडळी भाजपला दे माय धरणी ठाय करण्यासाठी करत आहेत पण सत्ताधाऱयांना त्याची फारशी जाणीव नाही. या आंदोलनाला खलिस्तानी, देशद्रोही अशा शेलक्मया शिव्यानी हिणवून आणि भाजपधार्जिण्या प्रसारमाध्यमांनी जबर मोहीम चालवून हैराण करण्याचा केलेला प्रयत्न अंगलट येत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोकदल मुसंडी मारू शकतात अशी कबुली भाजपाई आत्ताच खाजगीत देत आहेत. याचा अर्थ म्हणजे शेतकरी आंदोलन यशस्वी होत आहे. उत्तरेत ते भाजपला त्रास देणार आहे असा होतो. लखीमपूर खेरीने आगीत तूप ओतण्याचे काम केलेले आहे. योगी सरकारने कितीही सारवासारव केली तरी भाजपा हादरली आहे हे नक्की. हातातोंडाशी आलेला घास अचानक जातो काय अशी पुसटशी शंका येऊ लागली आहे. भक्त मंडळी मात्र योगींना हरवेल असा लाल अजून जन्माला यायचा आहे असे छातीठोकपणे दावे करत आहेत. त्यांच्या दाव्यात तथ्य नाही असे नाही. याला कारण राज्यातील उच्च जाती भाजपबरोबर आहेत असे सध्याचे तरी चित्र आहे. ठाकूर असोत अथवा ब्राह्मण वा बनिया अथवा कायस्थ, भाजपच्या हिंदुत्वाची त्यांची ओढ कमी झालेली नाही. याचबरोबर गैरयादव इतर मागासवर्गीय जातींना बरोबर घेऊन सामाजिक समीकरणे साधण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न मोदी-शहा यांनी केला आहे.वादग्रस्त केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना एवढय़ा मोठय़ा कांडानंतरदेखील जीवदान मिळाल्याने भाजपची बदनामी वाढली नसती तरच नवल होते. मिश्रा यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले ते ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी. त्यांना नारळ दिला तर राज्यातील हा अगोदरच नाराज असलेला समाज बिथरून जाईल आणि त्यांना ठेवले तर विरोधकांचा हल्ला तीव्र होणार अशा कात्रीत भाजपा सापडलेली आहे. योगी ठाकूर असल्याने आणि त्यांनी या समाजाला पुढे नेण्याचे राजकारण केल्याने ब्राह्मण फारसा खुश नाही आणि त्याला आपल्याकडे ओढण्यासाठी विरोधी पक्ष कामाला लागले आहेत.
लखीमपूर खेरीने एकीकडे शेतकरी आंदोलन परत एकदा प्रकाशझोतात आले आहे तर दुसरीकडे भाजपचे विरोधक एक होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी आघाडीने बोलावलेला राज्यव्यापी बंद हा त्याचाच एक भाग आहे. या एकीत अनेक अडथळे आहेत. बंगालमधील विजयाने ममता बॅनर्जींची महत्त्वाकांक्षा जागृत झालेली आहे आणि त्या काँग्रेसला कमजोर करायला लागल्या आहेत असेदेखील चित्र दिसत आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर राजकारणातील रंग झपाटय़ाने बदलू लागतील असे अंदाज होत आहेत. घोडामैदान जवळच आहे. 2024 ची लढाई कशी होणार ते 2022 मध्ये ठरणार आहे. भाजप राष्ट्रीय पातळीवर एकाकी पडू लागला आहे हे सत्ताधाऱयांसाठी खचितच चांगले चिन्ह नाही.एअर इंडियाला परत टाटांच्या हवाली करून मोदी सरकारने आर्थिक क्षेत्रात एक चांगला निर्णय घेतला आहे हे निःसंशय. पण अशांत काश्मीर खोऱयातून परत सुरू झालेले काश्मिरी पंडित आणि इतर अल्पसंख्याकांचे पलायन ही चिंताजनक गोष्ट आहे. भ्0ााजपला हे परवडणारे नाही.
. सुनील गाताडे