भारतीय वायुदलाच्या जम्मू येथील तळावर रविवारी झालेल्या हल्ल्यामुळे पाकपुरस्कृत दहशतवादाचा धोका कायम असल्याचेच दर्शवून दिले आहे. या हल्ल्यात मानवरहित ड्रोनचा उपयोग करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी तपासात आढळल्याने ती अधिक गंभीर बाब आहे. हल्ल्यामुळे कोणतीही हानी झालेली नाही, असे वायुदलाकडून स्पष्ट करण्यात आले. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांची पार्श्वभूमी या हल्ल्याला निश्चितपणे आहे. अमेरिकेची अफगाणिस्तानमध्ये जवळपास 20 वर्षे तळ ठोकून राहिलेली सेना येत्या दोन-अडीच महिन्यांमध्ये मागे घेतली जाणार आहे. त्यानंतर त्या देशात तालिबानचे राज्य येणार हे उघड आहे. तालिबानच्या वृत्तीत आता बराच बदल झाला असून ती दहशतवादाचा मार्ग सोडण्यास तयार आहे, असे सांगितले जाते. याच भरवशावर अमेरिकेने तेथून परतण्याची योजना आखली आहे. तथापि, तालिबान खरोखरच शांततेच्या मार्गाने वाटचाल करणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तालिबानमध्येही अनेक गट असून त्यांच्यात एकमेकांमध्ये स्पर्धा असते. त्यामधील काही गट जरी शांततेच्या मार्गाने वाटचाल करण्यास तयार आहेत, असे मानले तरी इतर गट त्यांना नामोहरम करण्यासाठी दहशतवादाचाच आधार घेऊ शकतात. जम्मू येथील हल्ल्याचा अफगाणिस्तानातील घडामोडींशी आजतरी संबंध असल्याचे दिसत नसले, तरी अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील अस्तित्वाचा जो दबाव दहशतवादी गटांवर होता, तो लवकरच नाहीसा होणार असल्याने दहशतवादी संघटनांचा आत्मविश्वास बळावणार हे उघड आहे. जम्मूतील हल्ला लष्कर ए तोयबाने केल्याचा प्राथमिक कयास आहे. अमेरिकेचा दबाव संपल्यानंतर ज्याप्रमाणे त्या देशातील दहशतवादी संघटना मोकाट सुटण्याची शक्यता आहे, तशीच पाकिस्तानातील आणि काश्मीरमधील दहशतवादी संघटनांसंबंधातही आहे. कारण या संघटना वरवर वेगवेगळय़ा दिसत असल्या तरी, त्यांचे परस्परांशी संबंध असतात हे लपून राहिलेले नाही. याशिवाय, नुकत्याच पॅरिसमध्ये झालेल्या एएफटीएफच्या बैठकीत पाकिस्तानला ‘गे’ रंगाच्या सूचीत कायम ठेवण्यात आले आहे. याचाच अर्थ असा की, पाकिस्तान आजही दहशतवादाला पाठबळ आणि आर्थिक साहाय्य पुरवितो. या सूचीतून बाहेर येण्यासाठी पाकिस्तानने गेल्या दोन महिन्यात बरेच प्रयत्न केले. अमेरिका, फ्रान्स इत्यादी देशांच्या प्रमुखांना पाकिस्तानी आंबे भेट म्हणून पाठविण्यापासून हाफिझ सईदला डांबून ठेवण्याच्या नाटकापर्यंत अनेक प्रकार केले. तथापि, पाकिस्ताच्या प्रशासनावर खऱया अर्थाने पकड असते ती विविध दहशतवादी संघटनांचीच. त्यामुळे प्रशासन किंवा निवडून आलेले सरकार हा केवळ एक फार्स असतो. पाक प्रशासन आणि तेथील सरकार यांची दहशतवादाला फूस असतेच. वरकरणी मात्र, आपण दहशतवादाविरोधात आहोत, असा आव तेथील प्रशासन आणत असते. मात्र, दहशतवादी त्यांचे काम करीतच असतात. त्यामुळे जम्मूतील हल्ल्यात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेचा संबंध, त्या देशाची ‘नियत’ दाखवून देणाराच आहे. या हल्ल्यापूर्वी एक दिवस म्हणजेच शुक्रवारी संयुक्त राष्ट्रसंघात भारताने दहशतवादासंदर्भात पाकिस्तानचे वाभाडे काढले होते आणि विश्वसमुदायालाही सावध केले होते. भारताची ही भूमिका किती खरी होती, हे या हल्ल्यामुळे समजून येते. भारताविरोधात पाकिस्तान नेहमीच दहशतवादाचा उपयोग एक राजकीय शस्त्र म्हणून करत आला आहे. या धोरणापासून तो देश दूर जाण्याची शक्यता नाही. जम्मू येथील हल्ल्याला ही पार्श्वभूमी असली तरी भारतालाही आपल्या संरक्षणासाठी सर्व प्रकारची सज्जता ठेवावीच लागणार हे उघड आहे. दहशतवादाशी कोणतीही तडजोड न करता, आणि शांततेच्या स्वप्नरंजनात मग्न न होता, कठोरपणे त्याचा बीमोड करण्याचे भारताचे उत्तरदायित्व आहे. सेनेचे आधुनिकीकरण, अद्ययावत तंत्रज्ञानाचे साहाय्य, अधिक प्रभावी आणि मारक शस्त्रसंभार तसेच आधुनिक इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सीमेवर दक्षता आदी उपाययोजना वेगाने कराव्या लागणार आहेत. त्या करण्याचा प्रयत्न सरकार आणि सेना कसोशीने करीत आहेत, हे खरे असले तरी त्यांचा वेग वाढवावा लागणार हे निश्चित. कारण, शेवटी कोणतीही उपाययोजना कोणता परिणाम दाखवते, यावरच तिचा प्रभावीपणा मोजला जात असतो. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा घटनेचा अनुच्छेद 370 रद्द केल्यापासून तेथे बऱयाच प्रमाणात शांतता असल्याचे दिसून येते. दहशतवादी हल्ल्यांची संख्या पुष्कळच कमी झाली आहे. सेना आणि तेथील जनता यांच्यात सुसंवाद निर्माण झालेला दिसून येतो. याच शांततेला तडा देण्याच्या दृष्टीने हा हल्ला करण्यात आला, हे उघड आहे. त्यामुळे अशा घटना होऊ देऊ नयेत हे भारताने सुनिश्चित केले पाहिजे. विश्व समुदायानेही याकामी भारताला भक्कम पाठिंबा देण्याची आणि दहशतवादी प्रवृत्तीला एकाकी पाडण्याची आवश्यकता किती प्रमाणात आहे, हेच अशा घटनांमधून नेहमी दृग्गोचर होत असते. आजही दहशतवादाविरोधात जगात म्हणावी तशी एकवाक्यता नाही. प्रत्येक देश स्वतःच्या हितसंबंधांचा विचार करून दहशतवादासंबंधी धोरण ठरविताना दिसतो. शांततावादी जगतातील कोणत्याही देशाला दहशतवादाचा समान धोका असला, तरी उपायोजना सामायिकरित्या केली जात असल्याचे दिसून येत नाही. याचा लाभ दहशतवाद्यांना मिळतो. तेव्हा दहशतवादाविरोधात निर्दयपणे आणि कोणत्याही दबावात न येता कठोर कारवाई करणे आणि दुसऱया बाजूला आंतरराष्ट्रीय क्षेत्रात दहशतवादाविरोधात विश्व समुदायाला एकत्र करण्यासाठी प्रयत्न करणे या धोरणाला पर्याय नाही. भारताने हे धोरण बऱयाच कालावधीपासून आचरणात आणलेले आहे हे खरे असले तरी त्याची तीव्रता वाढविली पाहिजे, हेच या हल्ल्याने पुन्हा अधोरेखित केले आहे.
Previous Articleस्वतःच्या गावी पोहोचताच राष्ट्रपती भावुक
Next Article भारत-जपान संबंध अत्यंत बळकट
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.