प्रतिनिधी/ पणजी
दहावी-बारावी या दोन्ही परीक्षांसाठी केंद्रांवर मास्क, सामाजिक अंतर राखणे सर्वांसाठी बंधनकारक करण्यात आले असून परीक्षेच्या एका वर्गात फक्त केवळ 12 विद्यार्थ्यांना बसण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. या अगोदर ही मर्यादा 25 होती.
दहावी परीक्षा सुरळीत होण्यासाठी बारावीतील शिक्षकांचा उपयोग करण्यात येणार असून बारावी परीक्षेसाठी दहावीतील शिक्षकांचा वापर केला जाणार आहे. गरज पडली तर शिक्षकेत्तर कर्मचाऱयांची देखील मदत घेण्यात येणार असल्याची माहिती गोवा बोर्डातील सूत्रांनी दिली.
पाणी, सॅनिटायझर, मास्क, ग्लुकोज उपलब्ध
प्रत्येक परीक्षा केंद्रावर, उपकेंद्रावर एक स्टॉल तयार केला जाणार असून येथे पाण्याची बाटली, सॅनिटायझर, ग्लुकोज, मास्क हे उपलब्ध केले जाणार आहेत. परीक्षा सुरू होण्यापूर्वी आणि नंतर देखील मुलांना त्याचा वापर करता येणार आहे.
मुलांना परीक्षा केंद्रापर्यंत आणणे व नेणे हे काम पालक करतात, परंतु ज्या मुलांना केंद्रांवर येणे जाणे तसेच घरापर्यंत पोहोचण्यासाठी सोय नाही त्यांची सोय करण्याची जबाबदारी शाळेचे मुख्याध्यापक तसे उच्च माध्यमिक शाळांच्या प्राचार्यांकडे सोपवण्यात आली आहे.
मुलांचे अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही बंधने घालून एका वेगळ्याच वातावरणात मुलांना दहावी-बारावीची परीक्षा द्यावी लागणार आहे. मास्क, सामाजिक अंतर अशी बंधने यापुर्वी कधीच नव्हती. मुलांना मोकळ्या वातावरणात परीक्षा देणे आधिक योग्य श्रेयस्कर ठरले असते परंतु आता नाईलाज म्हणून ही बंधने पाळूनच परीक्षा द्यावी लागणार आहे. या बंधनाचे कोणतेही भय न बाळगता मुलांनी दोन्ही परीक्षा द्याव्यात म्हणून पालक, शिक्षकांनी त्यांचे समुपदेश, मार्गदर्शन करावे, असे आवाहन गोवा बोर्डातर्फे करण्यात आले आहे. दहावी-बारावी परीक्षेची तयारी मुलांनी सुरू केली असून अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत केले आहेत .