जिल्हा परिषद अध्यक्षांकडे मांडली निवेदनाद्वारे कैफियत
प्रतिनिधी/रत्नागिरी
शासनाच्या प्रचलित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षक यांचा आंतरजिल्हा बदली टप्पा 4 पूर्ण केला आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्य़ातून मराठी माध्यमातील शिक्षकांच्या झालेल्या बदल्यांमध्ये संवर्ग 1 मधील दुर्बल घटकातील रत्नागिरी जिल्ह्य़ातून 17 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. या शिक्षकांना प्राधान्याने प्रथमतः कार्यमुक्त करावे, असे शासन आदेश असतानाही अजूनही कार्यमुक्त केलेले नसल्याची कैफियत जिल्हा परिषद अध्यक्षांकडे मांडली आहे.
कोरोना विषाणूने राज्यभरात थैमान घातले आहे. या आजाराने बाधित होणाऱयांची संख्या दिवसागणिक अधिकच वाढते आहे. या संकटाची तीव्रता बघता सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या संवर्गनिहाय 15 टक्के बदल्या करण्याचा निर्णय जि. प. प्रशासन स्तरावरून घेण्यात आला आहे. शासनाकडून 15 टक्के बदल्यांचे आदेश आल्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्येही त्यांच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे आंतरजिल्हा बदल्या या ऑनलाईन पद्धतीने तर जिल्हांतर्गत बदल्या या ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत.
कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे यावर्षाच्या जिल्हांतर्गत बदल्या या सामान्य प्रशासन विभागाच्या 7 जुलै 2020 रोजीच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने करणे शक्य दिसत नाही. त्यामुळे जिल्हांतर्गत बदल्या सध्या ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहेत. तथापी, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठीची प्रक्रिया यापूर्वी सुरु केलेली आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदल्या या प्रचलित धोरणानुसार ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहेत.
बदली प्रक्रिया पार पाडताना कोविड-19 प्रादुर्भाव संदर्भातील मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे. अर्ज घेण्याच्यावेळी सामाजिक अंतर पाळले जाईल, याची दक्षता घ्यावी. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या या 15 टक्के मर्यादेपेक्षा जास्त होणार नाहीत. याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद शिक्षक यांचा आंतरजिल्हा बदली टप्पा 4 पूर्ण केला आहे. त्याद्वारे जिल्ह्य़ातून मराठी माध्यमातील 324 शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यात संवर्ग 1 मधील दुर्बल घटकातील रत्नागिरी जिल्हय़ातून 17 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. मात्र 7 जुलै 2017 च्या शासन निर्णयानुसार संवर्ग 1 मधील शिक्षकांना प्राधान्याने प्रथमतः कार्यमुक्त करावे, असे आदेशित केले आहे. मात्र अजूनही या संवर्ग 1 मधील शिक्षकांना कार्यमुक्त केलेले नाही.
रत्नागिरी जिल्हय़ाची रिक्त पदांची टक्केवारी 9.57 टक्के इतकी आहे. त्यामुळे सर्व 324 शिक्षकांना कार्यमुक्त करता येणार नाही. परंतु शासन निर्णयानुसार संवर्ग 1 मधील 17 शिक्षकांना नियमानुसार कार्यमुक्त करता येईल, असे या शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यासाठी शिक्षक भरतीची होण्याची वाट बघण्याची गरज नाही. या संवर्ग 1 मधील 17 शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर रिक्त पदांच्या टक्केवारी 10 पेक्षा जास्त जाणार नाही. त्यामुळे संवर्ग 1 मधील दुर्बल घटकांतील शिक्षकांना कोरोनासारख्या आजारात स्वगृही आपल्या आई-वडिलांजवळ जाण्यासाठी सहानुभूतीपूर्वक निर्णय घेत न्याय द्यावा व तत्काळ कार्यमुक्त करावे, अशी मागणी जि. प. अध्यक्ष रोहन बने यांच्याकडे करण्यात आली आहे.