पहिल्या टप्प्यात चार तालुक्यात इंटरनेट जोडणी / एका गावात 100 कनेक्शनची आवश्यकता
संतोष सावंत / सावंतवाडी:
एकेकाळी मोबाईल सेवेचे सर्वाधिक ग्राहक असलेल्या दूरसंचारने येत्या एक जुलैपासून भारत एअर फायबर सेवेच्या माध्यमातून घरोघरी इंटरनेट ब्रॉडबॅन्ड सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी एका गावात जवळपास 100 कनेक्शन बंधनकारक राहणार आहे. पहिल्या टप्प्यात कणकवली, कुडाळ, मालवण, देवगड या चार तालुक्यात भारत एअर फायबरची जोडणी केली जाणार आहे, असे दूरसंरचार प्रबंधक सुनील मांजी यांनी स्पष्ट केले.
20 वर्षांपूर्वी सिंधुदुर्गात गावागावात टेलिफोन जोडणीसाठी पाच-पाच महिने वेटिंग लिस्ट लागत होती. त्यानंतर कनेक्शन मिळायचे. जवळपास लाखाच्या घरात लॅन्डलाईन जोडण्या होत्या. मात्र, गेल्या पाच वर्षात लँडलाईनची जागा मोबाईलने घेतली. र्लंडलाईन संख्या निम्म्यावर आली. गावागावात खासगी कंपनीचे टॉवर अन् सीमकार्ड उपलब्ध होऊ लागल्याने लँडलाईन घटले. मोबाईल संख्या एक लाखाच्या घरात आहे. जिल्हय़ाची लोकसंख्या जवळपास दहा लाख आहे. त्यात फक्त दूरसंचारचे ग्राहक दोन टक्केच आहेत. त्यामुळे दूरसंचारचा डोलारा सांभाळणे मुश्किल झाले आहे. निम्म्या अधिकारी, कर्मचाऱयांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. खासगी ठेकेदारी पद्धतीने डोलारा सांभाळला जात आहे.
भारत एकर फायबर जोडणी
आता जिल्हय़ात भारत एअर फायबर योजना राबविण्यात येणार आहे. घरोघरी या एअर फायबरद्वारे टॉवरच्या माध्यमातून जोडण्या दिल्या जाणार आहेत. शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही ही योजना चालणार आहे. एका गावात भारत एअर फायबरचा टॉवर बसविल्यानंतर त्या भागात जवळपास 100 कनेक्शनची आवश्यकता लागणार आहे. प्रथम कणकवली, कुडाळ, मालवण, देवगड या तालुक्यात जवळपास एक हजार जोडण्या अपेक्षित आहेत, असे मांजी यांनी स्पष्ट केले. यासाठी केबल अथवा अन्य खर्च लागणार नाही. ग्राहकाने टेलिफोन व
ब्रॉडबँन्ड संच आणायचा आहे. फक्त दूरसंचार विभाग टॉवरवरून जोडणी देणार आहे.
365 ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर सेवा
मांजी म्हणाले, जिल्हय़ातील 365 ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर सेवा इंटरनेट जोडणी पूर्ण झाली आहे. कलंबिस्त पंचक्रोशीत गेले पंधरा दिवस दूरध्वनी सेवा खंडित आहे. तेथील मेकॅनिकला ठेकेदाराने पगार न दिल्याने काम सोडले आहे. लवकरच तेथे नवीन कर्मचारी नेमणूक करून दूरध्वनी सुरळीत केले जाणार आहेत.