12 राज्यांमध्ये एकाचवेळी मोहीम ः राजस्थान, महाराष्ट्रात मध्यान्ह भोजन प्रकरणी कारवाई
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्राप्तिकर विभागाने (आयटी) बुधवारी देशभरात एकाचवेळी 100 हून अधिक ठिकाणी छापे टाकले. मध्यान्ह भोजन आहार योजनेतील गैरव्यवहार, राजकीय फंडिंगमधील करचोरी आणि मद्य घोटाळय़ांसंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तराखंडसह 12 राज्यांमध्ये पहाटेपासून दिवसभर आयटीची कारवाई सुरू होती. महत्त्वाच्या राज्यांबरोबरच दिल्लीस्थित स्वतंत्र थिंक टँक सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चवरही (सीपीआर) छापा टाकला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यान्ह भोजन प्रकरणात प्राप्तिकर पथकांनी छापे टाकले आहेत.
राजस्थानमधील राज्यमंत्री राजेंद्र यादव यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या 53 हून अधिक ठिकाणी प्राप्तिकर छापे टाकण्यात आले आहेत. बुधवारी पहाटे साडेपाच वाजल्यापासून छापेमारी सुरू झाली. हे प्रकरण मध्यान्ह भोजन पुरवठय़ातील अफरातफरीशी संबंधित आहे. कोटपुतली येथे मध्यान्ह भोजनाचा पुरवठा करणाऱया कारखान्यावर छापा टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच जयपूरमधील राजेंद्र यादव यांच्या सरकारी आणि खासगी निवासस्थानाव्यतिरिक्त त्यांच्याशी संलग्न असलेल्या कंपन्यांवरही कारवाई सुरू होती.
छत्तीसगडमध्ये आयटीने काही मद्यविपेत्यांच्या मालमत्तांवर छापे टाकले आहेत. यामध्ये अमोलक सिंग असे एका दारू व्यावसायिकाचे नाव आहे. तसेच रामदास अग्रवाल, त्यांचा मुलगा अनिल, आर. के. गुप्ता यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. ही कारवाई दारू घोटाळा आणि करचुकवेगिरीशी संबंधित आहे.
उत्तर प्रदेशात 24 शहरांमध्ये छापे
आयटीच्या पथकांकडून उत्तर प्रदेशच्या 24 शहरांमध्ये छापे टाकण्यात आले. राजधानी लखनौमध्ये बुधवारी सकाळी आयटी टीम राष्ट्रीय क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे प्रमुख गोपाल राय यांच्या घरी पोहोचली. गोपाल राय सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक ग्रीव्हन्स अँड इन्व्हेस्टिगेशन नावाची संस्था चालवतात. ते संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या घरी सायंकाळपर्यंत कागदपत्रांची छाननी सुरू होती. हे प्रकरण राजकीय निधी आणि करचुकवेगिरीशी संबंधित आहे.
दिल्लीतील थिंक टँकवर छापा
आयटीने दिल्लीस्थित स्वतंत्र थिंक टँक सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चवरही छापा टाकला आहे. सीपीआरवरील ही कारवाई हरियाणा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांशी संबंधित आहे. सध्या सीपीआरच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षा मिनाक्षी गोपीनाथ आहेत. राजकीय शास्त्रज्ञ गोपीनाथ यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अध्यापन केले आणि नवी दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजचे प्राचार्य राहिले. यामिनी अय्यर या तिच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी आहेत. बोर्डाच्या सदस्यांमध्ये माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन आणि आयआयएमचे प्राध्यापक रामा विजापूरकर यांचा समावेश आहे. भाजप सरकारचे प्रमुख टीकाकार आणि शिक्षणतज्ञ प्रताप भानू मेहता हेही या केंद्राचे प्रमुख राहिले आहेत.
बोगस निधीप्रकरणी पक्षांवर कारवाई
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महसूल विभागाला पत्र लिहून छुप्या पद्धतीने बोगस निधी स्विकारणाऱया राजकीय पक्षांवर कारवाई करावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार नियम न पाळता देणग्या स्विकारणारे पक्षही प्राप्तिकर विभागाच्या हिटलिस्टवर आले आहेत. देणगीची माहिती आयोगाला देण्यात आली नसल्याने त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे. आयटी विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार देशात 199 नोंदणीकृत पक्ष आहेत, परंतु 219 मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आयटी विभागात 2019-20 मध्ये 608 कोटी रुपयांच्या सूटचा दावा केला होता.
ममतांच्या मंत्र्याच्या 6 ठिकाणांवर छापे
ममता सरकारचे कायदा मंत्री मलय घटक यांच्या 6 ठिकाणांवर सीबीआयने बुधवारी सकाळी छापे टाकले. घटक यांच्यावर कोळसा तस्करीचा आरोप आहे. सीबीआयची तीन पथके सकाळी 8 वाजल्यापासून घटक यांच्या निवासस्थानासह 6 ठिकाणी शोध घेत आहेत. त्यापैकी कोलकात्यात 5 ठिकाणी आणि आसनसोलमधील एका ठिकाणी पथके उपस्थित आहेत. अनेक नोटिसा पाठवूनही मलय चौकशीसाठी आले नसल्यामुळे हा छापा टाकण्यात आल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.