वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रीडा क्षेत्रातील निवृत्त क्रीडापटूंना नोकरीची संधी मिळावी या हेतूने येत्या काही दिवसांमध्ये देशात एक हजार ‘खेलो इंडिया’ केंदांची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजु यांनी मंगळवारी येथे केली.
एफआयसीसीआयतर्फे येथे आयोजिलेल्या 10 व्या ग्लोबल टर्फ 2020 क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावेळी केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी वरील घोषणा केली. देशातील खेळाडू आर्थिक समस्येमुळे त्रासला जातो आणि त्यांची स्थिती पाहून नवी पिढीही नाउमेद होते. दरम्यान आर्थिक समस्या असलेल्या देशातील क्रीडापटूंना शासनातर्फे यापुढे आर्थिक मदत दिली जाणार असून ऍथलेटिक्स क्षेत्रातून निवृत्त झालेल्या क्रीडापटूंना नोकरीची संधी शासनाकडून देण्यात येणार आहे. याकरिता संपूर्ण देशामध्ये लवकरच एक हजार ‘खेलो इंडिया’ केंद्रांची स्थापना केली जाणार असून या केंद्रामध्ये निवृत्त क्रीडापटूंना नोकरी दिली जाईल, असेही क्रीडामंत्र्यांनी सांगितले. भारताच्या क्रीडा धोरणामध्ये खूपच बदल करण्याचा शासनाचा विचार असून देशाचा क्रीडा दर्जा सुधारण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील. 2028 च्या लॉस एंजिल्स ऑलिंपिक स्पर्धेत पदक विजेत्या देशामध्ये पहिल्या 10 क्रमांकात भारताचा सहभाग राहण्यासाठी आतापासून शासनाचे प्रयत्न चालू असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी सांगितले.