दिवसभरात 37 हजार रुग्णांची नोंद ः 648 जणांचा मृत्यू ः
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या चार दिवसांपासून 25 हजारांच्या आसपास स्थिरावत असतानाच त्यामध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात देशामध्ये 37 हजार 593 नव्या बाधितांची भर पडली आहे. तसेच चोवीस तासात 648 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचदरम्यान दिवसभरात 34 हजार 169 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 3 लाख 22 हजार 327 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
देशात आतापर्यंत 3 कोटी 25 लाख 72 हजार 366 जणांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. एकंदर रुग्णांपैकी 4 लाख 35 हजार 738 जणांचा बळी गेला असून 3 कोटी 17 लाख 54 हजार 281 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केलेली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर हा 1.34 आहे, तर रिकव्हरी दर हा 97.68 टक्के आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या ही 0.98 टक्के एवढी आहे.