दिल्लीत सलग चौथ्या दिवशी हजारापेक्षा अधिक नवे रुग्ण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना संसर्गाची बाधा आतापर्यंत 1 लाख 82 हजार 902 जणांना झाली आहे. तर केंद्र सरकारच्या नियमावलीनंतर राज्यांनी संसर्गाची स्थिती पाहता लॉकडाऊन वाढविण्यास प्रारंभ केला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पंजाबमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन लागू राहणार आहे.
तर दिल्लीत सलग चौथ्या दिवशी 1 हजारपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. रविवारी सर्वाधिक 1,295 बाधित सापडले असून 13 जणांचा मृत्यू ओढवला आहे. राजधानीत आता 19 हजार 844 बाधित असून 473 जण दगावले आहेत. उत्तराखंडच्या एका मंत्र्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. मंत्र्याचे कुटुंब आणि कर्मचाऱयांसह 22 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
याचबरोबर ओडिशामध्ये 129, हरियाणात 118, बिहारमध्ये 118, आंध्रप्रदेशात 110, राजस्थानात 76, आसाममध्ये 56, उत्तराखंडमध्ये 53, त्रिपुरात 11, नागालँडमध्ये 7, मणिपूर आणि हिमाचल प्रदेशात प्रत्येकी 4 रुग्ण सापडले आहेत. शनिवारी देशात विक्रमी 8,335 नवे बाधित सापडले होते. तर एकूण 4,303 जणांनी कोरोनावर मात केली होती.
मागील एक आठवडय़ात 50 हजार 407 नवे रुग्ण सापडले असले तरीही रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या संख्येत 16 हजार 562 ची भर पडली आहे. प्रत्यक्षात या कालावधीत 32 हजार 528 बाधित बरे झाले असून 1317 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.
कोरोना विषाणू संसर्ग 28 राज्यांमध्ये फैलावला आहे. 7 केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना संकट निर्माण झाले आहे. यात दिल्ली, चंदीगड, अंदमान-निकोबार, जम्मू-काश्मीर, लडाख, पुड्डुचेरी आणि दादरा आणि नागर हवेली सामील आहे.