अमृतसरमध्ये केजरीवालांचा काँग्रेसवर शाब्दिक हल्लाबोल
अमृतसरमध्ये प्रचारासाठी रविवारी पोहोचलेले आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल तसेच पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे चेहरे भगवंत मान यांनी काँग्रेसला सर्कसची उपमा दिली आहे.
काँग्रेस पक्ष एक सर्कस ठरला असून ज्यात परस्परांमध्येच लढण्याची आणि पाय ओढण्याची स्पर्धा सुरू आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पत्नी परनीत कौर भाजपसाठी प्रचार करत आहेत. प्रत्यक्षात त्या काँग्रेसच्या खासदार आहेत. तर मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे बंधू अपक्ष म्हणून निवडणूक लढवत काँग्रेस उमेदवाराला पराभूत करत आहेत. कपूरथळामध्ये काँग्रेस नेते राणा गुरजीत सिंह अपक्ष म्हणून निवडणूक लढत असलेल्या स्वतःच्या मुलाला विजयी करण्यासाठी झटत आहेत. काँग्रेसमध्ये कोण कुठे आहे आणि काय करत आहे हेच माहित नसते अशी टीका केजरीवालांनी केली आहे.
चरणजीत सिंह चन्नी हे श्री चमकौर साहिब आणि भदौड या दोन्ही मतदारसंघात हरणार आहेत. आम आदमी पक्षाने या दोन्ही ठिकाणी तीनवेळा सर्वेक्षण करविले असून त्यातून ही बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे अवैध वाळू उत्खननाच्या आरोपांनी वेढले गेले आहेत. चमकौर साहिबच्या जनतेने चन्नी हे अवैध उत्खनन करत असल्याचे म्हटले आहे, असा दावा केजरीवालांनी केला.
मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी स्वतःच्या विरोधातीला आरोपांची चौकशी स्वतःच केली आणि 4 दिवसांमध्ये क्लीनचिट देखील मिळविली. आम्ही या चौकशीबद्दल अजिबात समाधानी नाही आहोत. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार येताच याची चौकशी भगवंत मान हे करविणार आहेत असे केजरीवाल म्हणाले.
मुख्यमंत्री चन्नी यांचे भाचे हनी सिंह यांनी ईडीसमोर जप्त झालेली रक्कम ही चन्नी यांची असल्याची कबुली दिली आहे. तरीही ईडीने अद्याप चन्नी यांना अटक केलेली नाही. काँगेस शिव्यांचे राजकारण करत आहे, तर आम्ही पंजाबच्या मुद्दय़ांवर बोलत आहोत असे त्यांनी म्हटले आहे.