गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचा आरोप
प्रतिनिधी/ मडगाव
औषधी वापराच्या नावाखाली गोव्यात आता गांजाची लागवड अधिकृतरित्या करण्यासाठी प्रस्ताव ठेवणारे प्रमोद सावंत यांचे भाजप सरकार आता नवीन वषी गोव्यात नवीन मटका सुरू करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.
आपल्या एका व्हिडीओ संदेशात सरदेसाई यांनी हा आरोप केला आहे. हा नवीन मटका सुरू करणाऱयांची यापूर्वीच मुख्यमंत्री सावंत यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. गोव्यात सध्या चालू असलेला मटका पूर्णपणे बंद करून हा नवीन मटका हे सरकार आणू पाहत आहे. त्याचाच परिणाम म्हणून उत्तर गोव्यातील सध्याचा मटका बंद केला आहे. दक्षिण गोव्यात जरी तो चालू असला, तरी लवकरच तोही बंद होऊन हा सरकारपुरस्कृत मटका सुरू होणार आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
गांजासंदर्भात सरकार हमी देऊ शकते काय ?
भाजप सरकारने गोव्यात गांजाची लागवड अधिकृतपणे सुरू करण्यासाठीच्या प्रस्तावाची फाईल पुढे केल्याचा आरोप सोमवारी सरदेसाई यांनी केला होता. मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अशी फाईल जरी पुढे आणलेली असली, तरी अजून तसा निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण दिले. त्यावर बोलताना सरदेसाई म्हणाले की, या स्पष्टीकरणातून सरकारने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. कर्करोगावर औषध म्हणून ही लागवड केली जाणार असल्याचे सरकारचे म्हणणे असले, तरी उत्पादित होणारा गांजा अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी वापरला जाणार नाही याची हमी सरकार कशी देऊ शकते, असा सवाल त्यांनी केला आहे. ….
राज्यात सध्या दक्ष विरोधकांची गरज
भाजपने गोवा विकायला काढला आहे. सरकारचा कारभार पाहिल्यास त्यांना गोवा हे विकृतीचे केंद्र बनवायचे आहे. गोवा हे व्यसनांचे केंद्र बनवू द्यायचे नसल्यास आता या सरकारचे हे असले इरादे नेस्तनाबूत करण्यासाठी ’टीम गोवा’ या संकल्पनेखाली सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. सरकारला अडविण्यासाठी दक्ष विरोधकांची गरज आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. आपल्या ‘सेव्ह गोवा नाऊ’ या संकल्पनेचा उल्लेख करताना, गोवा वाचविण्यासाठी आम्हाला आताच प्रयत्न करावे लागतील अन्यथा वेळ हातची निघून जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. दक्ष गोवेकरांमुळेच राज्य सरकारला ओल्ड गोवा परिसर पीडीए क्षेत्रात आणण्याच्या निर्णयापासून दूर जावे लागले याचा उल्लेख सरदेसाई यांनी केला. गोवा पुढच्या पिढीसाठी वाचवून ठेवायचा असेल, तर मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन या सरकारला विरोध करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
ऑफलाईन परीक्षांचा हट्ट सोडावा
विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईनच घेतल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे. त्याबद्दल बोलताना सरदेसाई म्हणाले की, केवळ आपण हा मुद्दा उपस्थित केला आहे म्हणून आपल्याला विरोध करण्यासाठी परीक्षा ऑफलाईन घेण्याचा मुख्यमंत्री सावंत यांनी हट्ट धरू नये. अजूनही कोविडची भीती गेलेली नाही. ब्रिटनमधून आलेल्या लोकांच्या ज्या चाचण्या घेतल्या गेल्या त्यांचे अहवाल अजून आलेले नाहीत. ते झटपट मिळण्यासाठी सरकारकडे कसलीही यंत्रणा नाही. अशा परिस्थितीत ऑनलाईन परीक्षा घेणे हाच एकमेव पर्याय आहे. जर सरकारने आपला हट्ट सोडून न देता विद्यार्थ्यांचा जीव धोक्मयात घातला, तर या सरकारला धडा शिकविण्यासाठी हे विद्यार्थीच पुढे येतील हे लक्षात ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.