ऑनलाईन टीम / पुणे :
एकविसाव्या शतकातील आव्हानांचा वेध घेत शिक्षण क्षेत्रातील संक्रमण आवश्यक असल्यानेच डाॅ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतखाली समिती स्थापन करुन विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होईल, या दृष्टीने नवीन शैक्षणीक धोरण आखण्यात आल्याचे मत केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
विद्यापीठ विकास मंच आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ यांच्यावतीने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ याविषयावर आज राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारचे उद्घाटन केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ‘एनवायसीएस इंडिया’ या फेसबुक पेजवरुन याचे थेट प्रसारण करण्यात आले.
यावेळी प्रकाश जावडेकर त्यांच्या मार्गदर्शनपर मनोगतात म्हणाले की, मी शिक्षणमंत्री असल्यापासून या धोरणाचा प्रवास जवळून अनुभवत आहे. या धोरणात एकविसाव्या शतकात भारताला आत्मविश्वासाने पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे. ‘सबको शिक्षा आणि अच्छी शिक्षा’ या सूत्रावर या धोरणाची आखणी करण्यात आली असून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर जाणा-यांना देखील या शैक्षणीक धोरणाद्वारे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला आहे. मागासवर्गीय, दिव्यांग, आर्थिक दृष्टया कमकुवत स्तरातील घटकांना शिष्यवृत्तीचे अनेक पर्याय खुले करण्यात आले आहेत. केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे.
खऱ्या अर्थाने परवडणा-या शिक्षणाचा राजमार्ग या धोरणाद्वारे आखला गेला आहे. या नवीन शैक्षणिक धाैरणामुळे अनेक पाश्यात्य शैक्षणिक संस्था भारतात येऊन त्यांच्या शैक्षणिक संकुलांद्वारे विद्यार्थांना शिक्षणाच्या अनेक नवनवीन संधी उपलब्ध करुन देतील. आता पर्यंत भारतीय विद्यार्थी परदेशांत जाऊन डाॅलरमध्ये त्यांची अर्थव्यवस्था बळक़ट करण्याचे काम करीत होता. ती बुद्धिमत्ता त्यांच्या प्रगती साठी खर्ची घालत होता. आता तोच विद्यार्थी भारतात राहून भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार होईल. तसेच या धोरणामुळे शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापन सर्वांचेच उत्तरदायीत्व वाढणार आहे.
थोडक्यात तंत्रज्ञानाचा आधार घेत संशोधन आणि प्रयोगशिलतेद्वारे देशाला प्रगती पथावर नेण्याचे उद्दिष्ट या शैक्षणिक धाेरणाद्वारे साध्य केले जाणार आहे. हॅकेथाॅन सारख्या स्पर्धांचे आयोजन करुन भारतीय समस्या केंद्र स्थानी ठेऊन त्यावर उत्तर शोधण्यासाठी विद्यार्थांना प्रोत्साहीत केले जाणार आहे.