बहुतांशी ग्राम पंचायतींवर मिळविली सत्ता : भाजपला संमिश्र यश
वार्ताहर / निपाणी
राजकीय वर्चस्व मिळविण्याचा पाया म्हणून ग्राम पंचायत निवडणुकांकडे पाहिले जाते. ही निवडणूक पक्ष चिन्हांवर होत नसली तरी पक्षीय राजकारणाची झालर मात्र निश्चितच लागलेली असते. निपाणी मतदारसंघात असणाऱया 27 ग्राम पंचायतींसाठी दुसऱया टप्प्यात म्हणजेच 27 रोजी मतदान झाले होते. यावेळेपासून सर्वांच्याच नजरा निकालाकडे लागल्या होत्या. उमेदवारांसह पक्षीय नेते, कार्यकर्ते यांची धाकधूक वाढली होती.
सकाळी 8 वाजता तालुका प्रशासनाच्या योग्य नियोजनानुसार मतमोजणीला प्रारंभ झाला. यानंतर अवघ्या दोन तासांतच आडी ग्राम पंचायतीतील हंचिनाळ व त्यापाठोपाठ सौंदलगा ग्राम पंचायतीच्या एका जागेचा निकाल लागला. यामध्ये भाजपने खाते उघडत श्रीगणेशा केला. पण त्यानंतर मात्र एका पाठोपाठ एक याप्रमाणे बहुतांशी काँग्रेसने आघाडी घेत आपले वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली.
गळतगा, अकोळ यासारख्या भाजपच्या हाती असणाऱया ग्राम पंचायती खेचून घेत काँग्रेस पुरस्कृत आघाडीने घोडदौड सुरू केली. यानंतर यमगर्णी, सौंदलगा, जत्राट, लखनापूर, यरनाळ यासह अनेक ग्राम पंचायतींवर आपले वर्चस्व निर्माण केले. भाजपने कोडणी, मांगूर ग्राम पंचायतीवर असणारी काँग्रेसची सत्ता हिसकावून घेत आपले वर्चस्व निर्माण केले. तर तिसऱया आघाडीने काँग्रेस-भाजपला धक्का देत कारदगा ग्राम पंचायतीवर वर्चस्व निर्माण केले.
निपाणी तालुक्यात 27 ग्रा. पं. साठी 84.77, चिकोडी तालुक्यात 35 ग्रा. पं. साठी 84.49, हुक्केरी तालुक्यातील 52 ग्रा. पं. साठी 84.30, गोकाक तालुक्यातील 32 ग्रा. पं. साठी 80.08, मुडलगीतील 20 ग्रा. पं. साठी 82.23, रामदुर्ग तालुक्यातील 33 ग्रा.पं. साठी 82.55, अथणीत 41 ग्रा.पं. साठी 82.64, कागवाडमधील 8 ग्रा.पं. साठी 80.94 तर रायबाग तालुक्यातील 33 ग्रा. पं. साठी 82.49 टक्के मतदान दोन टप्प्यात पार पडले होते. निपाणी, चिकोडी आणि रायबाग तालुक्यात काँग्रेसने बहुतांशी ग्राम पंचायतींवर सत्ता मिळविली आहे. तर अथणी, कागवाड, गोकाक आणि हुक्केरी तालुक्यातील ग्राम पंचायतींवर भाजपने वर्चस्व अबाधित राखले आहे.