पत्रकार परिषदेत दिली माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिह्यातील पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील हे शनिवार दि. 16 रोजी निलजी गावाला येत आहेत. ते नूतन ग्राम पंचायत सदस्यांसह ग्रामस्थांना मार्गदर्शन करणार आहेत. निलजी ग्राम विकास समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बेळगाव जिह्यातील जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन निलजी ग्राम विकास समितीचे छत्रु पाटील यांनी केले आहे.
भास्कर पेरे पाटील यांनी ग्राम पंचायत कशा प्रकारे चालवायची असते याचे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. त्यांनी केलेले काम हे अत्यंत उच्च प्रतीचे असून त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्यासाठीच निलजी ग्रामस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. शनिवारी दुपारी 2 वाजता ते मार्गदर्शन करणार आहेत. राम मंदिरसमोर भव्य मंडप घालून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
निलजी गावातील जनतेनेही विविध उपक्रम राबविले आहेत. मात्र भास्कर पेरे पाटील यांनी जे कार्य केले आहे त्या कार्याची माहिती आता त्यांच्याकडून जाणून घ्यायची असून त्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रु पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून सुदर्शन प्रभूजी (ईस्कॉन) हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रातील मंडळींचा सत्कारही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेवेळी ऍड. लक्ष्मण पाटील, सुनील पाटील, कल्लाप्पा मोदगेकर, जोतिबा मोदगेकर यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.