भाजपच्या फायद्यासाठी आठ टप्प्यात मतदान घेतल्याचा आरोप, भाजपकडून आरोपाचा इन्कार
वृत्तसंस्था/ कोलकाता
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी आठ टप्प्यात मतदान घेण्याची घोषणा केली आहे. अरोरा यांच्या घोषणेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाला बोचरा सवाल केला आहे. भाजपला फायदा पोहोचवण्यासाठीच निवडणूक आयोगाने आठ टप्प्यात मतदान घेण्याची तयारी चालवली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच निवडणूक आयोगाने पैशांचा गैरव्यवहाराकडे लक्ष द्यावे, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांवर ममता बॅनर्जींनी आक्षेप घेतला आहे. तामिळनाडू-केरळमध्ये एका टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. परंतु पश्चिम बंगालमध्ये मात्र आठ टप्प्यात मतदान होणार आहे, असे का? कोणाला फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न आहे? असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे. एका जिह्यात तीन-तीन टप्प्यात मतदान होणार आहे. यामागे काय उद्देश आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पश्चिम बंगालला येण्यापूर्वी आसाम आणि तामिळनाडूतील निवडणूक प्रचार करता यावा यासाठी असे करण्यात आले का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच भारतीय जनता पक्षाने केलेल्या मागण्या निवडणूक आयोगाने पूर्ण केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
भाजपचे मनसुबे उधळण्याचा इरादा
काहीही झाले तरी आम्ही भाजपचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही त्यांना संपवून टाकू. हिंदू आणि मुसलमानांचे ध्रुविकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सध्या मोठा राजकीय खेळ सुरू असून तो आम्हीच जिंकू, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. भाजप देशात फूट पाडत असून बंगालमध्ये वेगळय़ाच हालचाली करण्याचा त्यांचा डाव आहे, असेही त्या म्हणाल्या. केंद्रीय गृहमंत्र्यानी आपल्या ताकदीचा दुरुपयोग केला आहे. पण, आता खेळ सुरू झालाय, आम्ही खेळू आणि जिंकूच. भाजपाला नक्कीच पराभूत करू, असा विश्वास ममता बॅनर्जींनी व्यक्त केला आहे.
ममता बॅनर्जी आणखी संकटात
विधानसभा निवडणूक घोषित होण्यापूर्वीच तृणमूल काँगेसच्या 12 आमदारांनी पक्ष सोडला आहे. त्यातील आठ आमदार भाजपमध्ये समाविष्ट झाले आहेत. याशिवाय अनेक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनीही तृणमूल काँगेसला सोडचिठ्ठी दिली आहे. या गळतीतून पक्ष सावरलेलाही नसताना ममता बॅनर्जींच्या विश्वासातील मानले जाणारे आमदार सिदीकुला चौधरी यांनी मोंगलकोट मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास नकार दिला
आहे. हा बॅनर्जी यांना धक्का मानला जात आहे. चौधरी यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली. पक्ष निष्ठावंतांच्या हातातून निसटला आहे. कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जाते. आपण बरद्वान येथील भूमीपुत्र असून जिल्हय़ाचा विकास झाला नाही, तर ते आपण सहन करू शकणार नाही. आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी पक्षनेतृत्वाला दिला असून याचा गंभीर विचार करण्याची वेळ बॅनर्जी यांच्यावर आल्याचे दिसून येते असे जाणकारांचे मत आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारीच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून निवडणूक 8 टप्प्यांमध्ये होणार आहे.