दिवंगत नेते प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकात खळबळजनक गौप्यस्फोट : काँगेसच्या उणिवांवर ठेवले बोट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेपाळला भारतात समाविष्ट व्हायचे होते, मात्र तत्कालीन पंतप्रधान नेहरुंनी हा प्रस्ताव नाकारला, असा खळबळजनक गौप्यस्फोट दिवंगत ज्येष्ठ नेते, भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकात करण्यात आला आहे. नेहरुंऐवजी इंदिरा गांधी पंतप्रधान असत्या तर त्यांनी हा प्रस्ताव त्वरित स्वीकारला असता. नंतर सिक्कीम संदर्भात त्यांनी ते करून दाखविले होते, असेही प्रतिपादन त्यांनी पुस्तकात केले आहे. हे पुस्तक 5 जानेवारी 2021 रोजी प्रसिद्ध झाले आहे.
मुखर्जी यांच्या पुस्तकातील बराचसा आशय आता उघड होत आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या काळातील राजकारणाच्या अनेक अज्ञात बाबींवर झगझगीत प्रकाश टाकला आहे. त्यात नेपाळसंबंधी महत्त्वाचा आशयही आहे. नेपाळचे त्यावेळचे राजे त्रिभुवन वीर विक्रम शहा यांनी नेपाळचा समावेश भारतात करण्याचा प्रस्ताव नेहरुंना दिला होता. तथापि, तो त्यांनी नाकारला. नेपाळने स्वतंत्र देशच रहावे, असे मत नेहरुंनी व्यक्त केले. इंदिरा गांधी त्यावेळी देशाच्या पंतप्रधान असत्या तर त्यांनी मात्र तसे केले नसते. त्यांनी नेपाळचा प्रस्ताव एका तडाख्यात स्वीकारला असता. नंतरच्या काळात जेव्हा सिक्कीमने भारतात येण्याची इच्छा प्रदर्शित केली, तेव्हा चीनचा विरोध झुगारून इंदिरा गांधी यांनी सिक्कीमला भारतात घेतले होते, अशी टिप्पणीही मुखर्जी यांच्या या बहुचर्चित पुस्तकात आहे.
काँग्रेसला कळलेच नाही
राष्ट्रपतीपदी बसण्याचा मान मला मिळाला. तथापि, नंतरच्या काळात काँगेसचा ऱहास होत गेला.
आपला प्रभाव संपत चालला आहे, हे काँगेसच्या लक्षात आले नाही. आपल्याकडे लोकांना आकर्षित करून घेणारे नेतृत्व नाही, याकडे काँगेसचे दुर्लक्ष झाले. परिणामी, 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत काँगेसचा दारूण पराभव झाला, अशी कारणमीमांसा मुखर्जी यांनी पुस्तकात केली आहे.
तर संपुआला बोलावले असते
2014 मध्ये सत्तांतर घडले तेव्हा मी राष्ट्रपती होतो. त्या लोकसभा निवडणुकीत जर त्रिशंकू परिणाम समोर आला असता तर काँगेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीला सत्ता स्थापनेची प्रथम संधी मी दिली असती, असेही त्यांनी पुस्तकात स्पष्ट केले असून त्यांचे अनेक गौप्यस्फोट सध्याच्या राजकारणात खळबळजनक ठरण्याची शक्यता अनेक जाणकारांनी व्यक्त केली आहे.
मुखर्जींच्या पुस्तकातील आशय देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडविणारा ठरेल असे मत अनेक राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. पुस्तकात मतप्रदर्शन करताना व काही बाबींचा गौप्यस्फोट करताना त्यांनी समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांनी काँगेससंबंधीचे केलेले गौप्यस्फोट वादळी ठरण्याची शक्यता आहे.
दिवंगत नेत्याचे कथन…
- नेपाळसंबंधी गौप्यस्फोटाने राजकीय वादळ उठणे शक्य
- पंतप्रधान मोदी यांच्या कार्यशैलीवरही बरेच मतप्रदर्शन
- काँगेसची कार्यपद्धती आणि नेतृत्व कमजोरीवर टिप्पणी
पंतप्रधान मोदींवरही टिप्पणी…
मुखर्जी यांनी पंतप्रधान मोदींवरही काही मते प्रदर्शित केली आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या विरोधकांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. तसेच संसदेसाठी अधिक वेळ दिला पाहिजे. त्यांच्या प्रथम काळात त्यांनी संसदेसाठी विशेष वेळ दिला नाही. निश्चलनीकरणाची घोषणा त्यांनी मी राष्ट्रपती असतानाही मला सूचना न देताच केली. मात्र अशा घोषणा अचानक आणि कोणाला न सांगताच करायच्या असतात, असेही मुखर्जी यांनी नमूद केले आहे. पंतप्रधान मोदींची संसदेतील उपस्थिती कामकाजात बरेच सकारात्मक परिवर्तन घडवू शकते. यासंदर्भात त्यांनी त्यांच्या दुसऱया काळात पावले उचलावीत, अशा अनेक सूचनाही मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात मोदींना केल्या आहेत.