चीनधार्जिण्या ओलींचा पक्ष मागे ः नेपाळी काँग्रेसचा काठमांडूसह तीन ठिकाणी विजय
वृत्तसंस्था / काठमांडू
नेपाळमध्ये रविवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालयावर मतमोजणी मोठय़ा बंदोबस्तात सुरू आहे. यात आतापर्यंत नेपाळी काँग्रेसला आघाडी मिळाली असून सीपीएन-युएमएल हा चीनधार्जिणा पक्ष पिछाडीवर आहे. देशात पुन्हा त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. नव्या राजकीय पक्षांनी मोठय़ा पक्षांना या निवडणुकीत अनेक ठिकाणी धक्का दिला आहे.
नेपाळ निवडणूक आयोगानुसार बहुचर्चित काठमांडू मतदारसंघात नेपाळी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश मान सिंह यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे उमेदवार रविंद्र मिश्रा यांना पराभूत केले आहे. नेपाळच्या सत्तारुढ काँग्रेस पक्षाला मनाग आणि मस्तांग भागातही विजय मिळाला आहे. तर सीपीएन-युएमएल पक्षाला ललितपूर मतदारसंघात यश मिळाले आहे.
नेपाळमध्ये सुमारे 60 टक्के मतदान झाले आहे. तर मतदानादरम्यान झालेल्या हिंसेत एका व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. पंतप्रधान शेरबहादुर देउबा यांचा नेपाळी काँग्रेस आणि माजी पंतप्रधान केपी शर्मा यांचा नेपाळ कम्युनिस्ट पक्ष यांच्यातच मुख्य लढत आहे.
नेपाळ संसदेच्या एकूण 275 जागा आणि प्रांतीय विधानसभांच्या 550 जागांसाठी मतदान पार पडले आहे. 2015 मध्ये लागू करण्यात आलेल्या नव्या राजघटनेनंतर झालेली ही दुसरीच निवडणूक आहे. या निवडणुकीचा पूर्ण निकाल जाहीर होण्यास एक आठवडय़ाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
ओली यांची भारतविरोधी भूमिका
केपी शर्मा ओली यांनी स्वतःच्या प्रचारसभांमध्ये कालापानी क्षेत्राचा मुद्दा उपस्थित केला होता. 2019 मध्ये नेपाळचे पंतप्रधान असताना ओली यांनी भारत सरकारच्या नव्या नकाशावर आक्षेप घेत कालापानी हा नेपाळचा भूभाग असल्याचा दावा केला होता. तसेच कालापानी, लिपुलेगा, लिम्पियाधुरा या भूभागांना नेपाळमध्ये दर्शविणारा नकाशा प्रसिद्ध करत तो त्यांनी नेपाळच्या संसदेत संमत करवून घेतला होता. यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
नेपाळी काँग्रेस मध्यममार्गी पक्ष
नेपाळी काँग्रेसचे शेरबहादुर देउबा पंतप्रधान झाल्यावर दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यास सुरुवात झाली होती. त्यांनी वादाचे विषय बाजूला ठेवत द्विपक्षीय संबंध पूर्ववत करण्याच्या दिशेने पावले टाकली होती. चीनधार्जिण्या धोरणांना फेटाळत त्यांनी मध्यममार्गी भूमिका स्वीकारल्याने तणाव दूर झाला आहे.