महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात –
आपल्या पित्याने म्हणजे बाणासुराने आपल्या प्रियतमाला म्हणजे अनिरुद्धाला नागपाशांनी बांधले हे ऐकून उषा मनातून अत्यंत घाबरली. पराक्रमी अनिरुद्धावर अनेक राक्षसवीर एकाच वेळी तुटून पडले. अनिरुद्धाने एकटय़ानेच समर्थपणे त्या सर्वांचा सामना केला. एवढेच नव्हे तर त्या सर्वांना यथेच्छ चोप देऊन त्यांना पळता भुई थोडी करून सोडली. अनिरुद्धाला रणांगणात बाहूंच्या बळावर पराभूत करणे शक्मय नाही हे लक्षात आल्यावर बाणासुराने आपल्या आसुरी मायेचा वापर करून त्याला नागपाशात बांधले व त्याला रक्षकांच्या बंदोबस्तात ठेवून तो आपल्या महालात गेला आहे, ही सारी वार्ता उषेला सेवकांकडून कळली तेव्हा ती शोकाकूल होऊन जमिनीवर कोसळली. तिच्या सख्या धावून आल्या व त्यांनी तिला सावरले. त्या उषेला म्हणाल्या – सखे! अशी निराश होऊ नकोस. अनिरुद्ध व तुझ्या संबंधास गौरी मातेचा आशीर्वाद आहे, हे विसरलीस काय? अनिरुद्धाला नागपाशात बांधले असले तरी त्याला मृत्यूचे भय मुळीच नाही. परंतु नागबंधन सहन न झाल्यास अनिरुद्धाचे काही बरे वाईट होईल असे भय उषेला वाटू लागले. मार्जार जातीतील वाघ, बोके जसे आपल्याच पिल्लांना मारतात तसा आपल्या पित्याने आपला घात केला असा विचार तिच्या मनात आला. मी अविचाराने अनिरुद्धाला इथे माझ्या महालात उचलून आणवले. त्यामुळेच त्याच्यावर हे प्राणसंकट कोसळले. याला दुर्भागी मीच जबाबदार नाही काय? मी आता कुणाला शरण जाऊ? कोण या संकटातून माझी सुटका करेल? माझ्या वडिलांना शरण जावे तर ते केवळ अविवेकाने वागतात. माझी माता या संकटातून मला सोडवू शकत नाही. भगवती गौरी माता व भगवान शंकरांना माझी दया का येत नाही, असे विचारांचे काहूर उषेच्या मनात माजले.
अनिरुद्ध सुकुमार सुन्दर । अनिरुद्ध झुंजार एकाङ्गवीर । पद्मिनी लोभें गुंते मधुकर । तेंवि दुस्तर वरपडला । गुंतला माझिये पीतीसाठीं । म्हणोनि पडिला पाशसंकटीं । कोणापासीं सांगों गोष्टी । म्हणोनि पिटी ललाटीं । तंव पातली चित्रलेखा । तिणें आश्वासिली उषा । कान्तविषयीं न धरिं धोका। स्मरें अंबिकावरदान । जिणें तुजला दिधला वर। ते रक्षील तव भर्तार । ऐसा देऊनि नाभीकार । गेली सत्वर तेथोनी । मग जपूनि गरुडविद्या । विभूति चर्चिली अनिरुद्धा । कळों नेदितां रक्षकवृंदा । गेली प्रमदा गुप्तत्वें । सामर्थ्य मंत्राचें विशेष । शिथिल झाले नागपाश । चालों लागले श्वासोच्छ्वास । क्लेश अशेष हारपले । जैसा निद्रित पहुडे शयनीं । तेंवि अनिरुद्ध पाशबंधनीं । चित्रलेखेनें इतुकी करणी। करूनि सदनीं प्रवेशली । इतुकी कथा शोणितपुरिं। वर्तली ते कथिली पुरी । यावरी द्वारकेमाझारिं । करिती अवसरी ते ऐका ।
कमळातील मकरंदाच्या लोभाने भुंगा ज्याप्रमाणे कमलदलात कोंडला जातो व त्याला त्या कमळाच्या नाजूक पाकळय़ा पोखरता येत नाहीत, तसा अनिरुद्ध या संकटात उषेच्या प्रेमापोटी सापडला होता.
Ad. देवदत्त परुळेकर