वाराणसीच्या खजुरीमध्ये मोदींची प्रचारसभा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी वाराणसीमधील खजुरी येथे अखेरची प्रचारसभा घेतली आहे. या प्रचारसभेत पंतप्रधानांनी जनतेला संबोधित करताना विरोधी पक्षांवर शाब्दिक वार केले आहेत. घोर परिवारवादी देशाच्या हिताचे नव्हे तर स्वतःच्या हितासाठी काम करतात असे म्हणत त्यांनी समाजवादी पक्षाला लक्ष्य केले आहे.
उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी ही माझी अखेरची सभा आहे. उत्तरप्रदेशने आतापर्यंत अशी निवडणूक अनुभवली नसेल. पहिल्यांदाच एखादे सरकार विकास, सुदृढ कायदा-सुव्यवस्थेच्या बळावर जनतेचा आशीर्वाद मागत आहे. बांदापासून बहराइचपर्यंत पूर्ण उत्तरप्रदेश एकजूट होऊन येणार तर भाजपच असे म्हणत आहे. गुंडगिरी, भाऊ-पुतण्यावाद, परिवारवादाला लोकांनी नाकारले आहे. जे केवळ स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा विकास करतात, त्यांना जनता साथ देणार नाही. परिवारवादी जे बोलतात ते करत नाहीत आणि जे बोलत नाही ते मात्र करतात. परिवारवादी लोकांच्या घोषणापत्रात दंगलीचा उल्लेख नव्हता. परंतु त्यांच्या शासनकाळात पाच वर्षांपर्यंतच दंगलीच दंगली घडविण्यात आल्या. कार्यालये आणि पोलीस स्थानकांमध्ये समाजवादी पक्षाच्या शासनकाळात भाऊ-पुतण्यावादच चालत राहिल्याची टीका मोदींनी केली आहे.
काशीचे पुरातन वैभव कायम ठेवून आधुनिक स्वरुप देणे, विजेच्या तारांच्या जाळय़ांपासून मुक्ती, रुंद होणारे रस्ते, नवे रस्ते आणि उड्डाणपूल, 450 कोटी रुपये शेतकऱयांच्या खात्यात जमा करणे, कार्गो सेंटर, गोबर गॅस प्रकल्प, दूध प्रकल्प, तांदूळ संशोधन, नैसर्गिक शेतीवर भाजप सरकारने काम केले आहे. 10 मार्च रोजी निकाल लागल्यावर आणखीन विकास आणि कल्याणकारी योजनांवर काम केले जाणार आहे. पूर्वी कर्करोगावरील उपचार मुंबई आणि दिल्लीत व्हायचा. आता हे उपचार काशीमध्ये होत आहेत. हाच तर विकास आहे. यामुळे पूर्वांचलच्या लोकांमध्ये विश्वास वाढला आहे. 21 वे शतक देशासाठी काही आव्हाने घेऊन आले असून आम्ही यातून संधी शोधू असे उद्गार मोदींनी काढले आहेत.
ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मतदान करत असताना विकासाचा मुद्दा लोक विचारात घेतात. ही तर मग विधानसभा निवडणूक आहे. भारताचे लोक संकटाला सामोरे जात असताना परिवारवादी मदत करण्याऐवजी लोकांना अधिकच संकटात टाकत असल्याचे कोरोना काळात आम्ही पाहिले आहे. युक्रेन संकटातही हेच दिसून येत आहे. नकारात्मकता परिवारवाद्यांची विचारसरणी ठरली असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.
देशाचा खलिजना रिकामी झाला तरी चालेल, परंतु गरीबांच्या घरातील चुल पेटावी म्हणून आम्ही प्रयत्न केले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दोन वर्षापर्यंत सातत्याने गरीबांना मोफत धान्य देण्यात आले. ही अत्यंत मोठी कामगिरी आहे. सर्व लोकांना कोरोनावरील लस मोफत मिळवून देण्यात आली. आमच्या सरकारने 10 कोटी शौचालयांची निर्मिती करविल्याने आम्हाला माताभगिनींचे आशीर्वाद मिळत आहेत. तर आज देशच नव्हे तर विदेशातही लंगडा आंब्यापासून खादीचा प्रचार होतोय असे उद्गार पंतप्रधान मोदींनी काढले आहेत.