सरकारने संसदेत दिली माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील पर्यटनस्थळे आणि त्याच्याशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासकार्याला पुढे नेण्यासाठी स्वदेश दर्शन योजनेच्या दिशानिर्देशांमध्ये बदल करण्यात येणार आहे. यानंतर ‘स्वदेश दर्शन 2.0’ योजना आणली जाणार असल्याचे सरकारकडून सोमवारी संसदेत सांगण्यात आले. लोकसभेत राजीव प्रताप रुडी, जगदंबिका पाल आणि दानिश अली यांच्या पूरक प्रश्नांच्या उत्तरादाखल संस्कृती तसेच पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी ही माहिती दिली.
बिहारच्या सोनपूरमध्ये गजग्राहनजीक डॉल्फिन पॉइंटला योजने सामील करण्याविषयी रुडी यांनी विचारणा केली होती. तर जगदंबिका पाल यांनी बुद्ध सर्किट तर दानिश अली यांनी श्री वासुदेव तीर्थस्थळ मंदिर आणि सैयद शराफुद्दीन शाह विलायत दरगाहविषयी प्रश्न विचारला होता.
स्वदेश दर्शन योजना-1 अद्याप सुरू असून राज्य सरकारच्या सहकार्यातून याच्या अंतर्गत सर्व प्रकल्प पुढील वर्षापर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. पर्यटनस्थळे आणि त्याच्याशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासकार्याला चालना देण्यासाठी योजनेच्या दिशानिर्देशांमध्ये बदल केले जातील. त्यानंतर स्वदेश दर्शन 2.0 योजना सादर केली जाणार असल्याचे रेड्डी म्हणाले.
त्यानंतर योजनेत खासदार आणि राज्य सरकारांच्या प्रस्तावांना सामील केले जाईल. पर्यटनस्थळांचा विकास करणे ही प्रामुख्याने राज्य सरकारची जबाबदारी आहे. परंतु पर्यटन मंत्रालय स्वतःच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेच्या अंतर्गत पर्यटनस्थळांच्या विकासासाठी राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना वित्तीय सहाय्य प्रदान करत असल्याचे रेड्डी यांनी सांगितले आहे.