ऑनलाईन टीम / पुणे :
दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर दहा रुपये थेट खात्यावर आणि दूध भुकटीला पन्नास रुपये निर्यात अनुदान द्या, या मागणीसाठी 13 ते 18 ऑगस्ट दरम्यान पाच लाख शेतकऱ्यांचे ‘मातोश्रीला पत्र’ आंदोलन छेडण्याचा निर्धार महायुतीच्या बैठकीत करण्यात आला.
रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत, माजी मंत्री अनिल बोंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने महायुतीच्या नेत्यांची एक ऑनलाईन बैठक आज घेण्यात आली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महादेव जानकर, विनायक मेटे, अविनाश महातेकर यांच्यासह महायुतीचे सर्व खासदार आणि भाजपचे राज्याचे पदाधिकारी या ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते.
या बैठकीबाबत पत्रकारांना झूम मीटिंगद्वारे सदाभाऊ खोत यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 20 जुलैला महायुतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. एक ऑगस्टला दूध बंद आंदोलन केले. राज्यातील दुधाचा प्रश्न गंभीर होतोय. शेतकऱ्यांना दुधाला दर मिळत नाही. त्यामुळे 13 ते 18 ऑगस्ट दरम्यान राज्यातील पाच लाख शेतकरी आपल्या गोठ्यात बसून पोस्ट कार्डाद्वारे मातोश्रीला पत्र आंदोलन करतील. दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट दहा रुपये अनुदान खात्यावर, दूध भुकटी निर्यातीला 50 रुपये अनुदान आणि ते जमत नसेल तर राज्यातील सर्व एक कोटी तीस लाख लिटर दूध सरकारने 30 रुपये दराने खरेदी करावे, अशी आमची मागणी आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा खोत यांनी दिला.